दोन वर्षांत शहरात 150 मातामृत्यू; 'ही' आहेत मृत्यूची कारणे File Photo
पुणे

दोन वर्षांत शहरात 150 मातामृत्यू; 'ही' आहेत मृत्यूची कारणे

पुण्यातील 58 तर ग्रामीण भागातील 92 मातांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गेल्या दोन वर्षांत पुण्यात 150 मातामृत्यू झाले आहेत. त्यापैकी पुण्यातील रहिवासी असलेल्या मातांचे प्रमाण 58 आहे, तर उर्वरित 92 माता या ग्रामीण भाग व इतर जिल्ह्यांतील आहेत. त्या केवळ उपचारांसाठी पुण्यात आल्या होत्या. परंतु, मृत्यू येथे झाल्याने त्यांची नोंद पुण्यात करण्यात आली आहे.

कोणत्याही महिलेचा गरोदरपणात किंवा प्रसूतीनंतर 42 दिवसांच्या आत गरोदरपणाशी निगडित गुंतागुंतीमुळे किंवा त्याच्या व्यवस्थापनामुळे तसेच कोणत्याही कारणाने झालेला मृत्यू यांना मातामृत्यू म्हणून ओळखले जाते. यामध्ये अपघाताने किंवा प्रासंगिक कारणाने होणार्‍या मृत्यूंचा समावेश नसतो. परंतु, कोणतीही मातामृत्यू ही त्या कुटुंबासाठी धक्कादायक बाब असते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार नाकारण्यात आल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे.

या पार्श्वभूमीवर शहरात दोन वर्षे झालेल्या मातामृत्यूची कारणे, मृत्यू टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत शासनाकडून भर दिला जात आहे. प्रसूतीदरम्यान झालेला अतिरक्तस्राव, उच्चरक्तदाब व इक्लॅम्पसिया, सेप्टिक शॅाक, फुप्फुसविषयक गुंतागुंत, अ‍ॅनिमिया व हृदयविकार, संसर्गजन्य व इतर आजार अशा विविध कारणांमुळे मातामृत्यू होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

वर्षभरात म्हणजेच एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत शहरात 70 मातांचा मृत्यू झाला. त्यापैकी शहरातील 26, शहराच्या लगतच्या भागातील, ग्रामीण भागातील 25 व इतर जिल्ह्यांमधील 19 मातांचा समावेश आहे. यामध्ये 70 पैकी 22 म्हणजेच 31 टक्के मातांचा मृत्यू हा त्या स्वतःहून प्रसूतीसाठी उशिरा गेल्याने झाल्याचे निदर्शनास आले आहे. दोन वर्षांपूर्वीच्या (2023-2024) अहवालानुसार शहरात 79 मातामृत्यू झाले तर 45 म्हणजेच 56 टक्के मृत्यूमागे देखील उशिरा रुग्णालयात पोचण्याचे कारण आढळले.

दोन वर्षांतील मातामृत्यू

एकूण मातामृत्यू - 150

महापालिका हद्द - 58

महापालिकेच्या हद्दीबाहेरील - 56

इतर जिल्ह्यांतील - 35

इतर राज्यांतील - 1

मृत्यूची कारणे

उपचार घेण्यासाठी स्वत:हून उशिरापोहचलेल्या - 67

इतर कारणांमुळे वेळेत न पोचू शकलेल्या - 25

डॉक्टरांकडून वेळेत उपचार न मिळालेल्या - 8

इतर कारणे - 6

वेदना अंगावर काढणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे, घरातील जबाबदार्‍यांना प्राधान्य देणे, घरच्या घरी प्राथमिक उपचार करणे अशा कारणांमुळे गर्भवती दवाखान्यात पोहचायला उशीर करतात. याशिवाय, बाळ पायाळू असणे, रक्तस्राव होणे, इतर संसर्ग आदी प्रकारची गुंतागुंत हीच मातामृत्यूची प्रमुख कारणे निदर्शनास येत आहेत.
- डॉ. राजेश दिघे, सदस्य, मातामृत्यू अन्वेषण समिती, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT