पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा आजपासून (दि.21) सुरू होत आहे. यंदा एकूण 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके, प्रश्नपत्रिकेची पाकिटे ताब्यात घेतल्यापासून प्रश्नपत्रिका वितरित करेपर्यंतचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीवेळी जीपीएस प्रणालीचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदा पहिल्यांदाच प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाइन पद्धतीने भरून घेतले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य मंडळ आणि नऊ विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष स्थापन करून हेल्पलाइन सुविधा देण्यात आली आहे. राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार असून, त्यासाठी 271 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. मंडळाने निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी वैद्यकीय, अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, प्रकल्प व तत्सम परीक्षा देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची संबंधित परीक्षा लेखी परीक्षेनंतर दि. 20 मार्च 2024 ते 22 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात साडेदहा वाजता, दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचे आहे. परीक्षेची वेळ सुरू झाल्यावर प्रवेश दिला जाणार नाही, असेही गोसावी यांनी सांगितले.
हेही वाचा