पुणे : राज्यात गतवर्षीचा खरीप हंगाम २०२३ मधील नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा तसेच चंद्रपूर व जळगांव जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटीची प्रलंबित पीक विम्याची रक्कम देण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी (दि.३०) १ हजार ९२७ कोटी रुपये मंजूर केले. आता लवकरच संबंधित जिल्ह्यातील शेतकर्यांना त्यांच्या पीक विम्याची नुकसान भरपाई बँक खात्यावर जमा होईल, अशी माहिती कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विनयकुमार आवटे यांनी दिली.
ते म्हणाले, पिकविमा योजनेत गतवर्षीच्या खरीपात पिकांच्या नुकसानीपोटी शेतकर्यांना सुमारे ७ हजार ६२१ कोटींची नुकसान भरपाई मंजूर केलेली होती. त्यामध्ये पिक विमा योजना राज्यात बीड पॅटर्नवर आधारित राबविण्यात येते. म्हणजेच ज्या ठिकाणी पिक विमा हप्त्याच्या ११० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी ११० टक्क्यांपर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देते. तर त्या पुढील नुकसान भरपाई राज्य शासन शेतकर्यांना देते. या तत्त्वानुसार खरीप २०२३ हंगामातील मंजूर ७ हजार ६२१ कोटी रुपयांपैकी विमा कंपनीमार्फत शेतकर्यांच्या बँक खात्यावर आत्तापर्यंत ५ हजार ४६९ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. तर उर्वरित शिल्लक नुकसान भरपाईपैकी देय असलेली १ हजार ९२७ कोटींची नुकसान भरपाई वाटप प्रलंबित होती.
या प्रलंबित नुकसान भरपाईमध्ये जिल्हानिहाय देय असलेल्या विम्याच्या रक्कमेमध्ये नाशिक जिल्ह्यात ६५६ कोटी, जळगाव जिल्ह्यात ४७० कोटी, अहमदनगर जिल्ह्यात ७१३ कोटी, सोलापूर जिल्ह्यात २ कोटी ६६ लाख रुपये, सातारा जिल्ह्यात २७ कोटी ७३ लाख रुपये तर चंद्रपूरमध्ये ५८ कोटी ९० लाख रुपयांइतकी विम्याची रक्कम देणे बाकी होते. त्यानुसार रक्कम शासनाने मंजूर केल्यामुळे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच ही रक्कम जमा होणार असल्याचेही आवटे यांनी स्पष्ट केले.