नालासोपारा; पुढारी वृत्तसेवा : मुंबई, पुणे, नागपूरनंतर आता वसई, मीरा-भाईंदर सीसीटीव्ही ने जोडणार असून अवैध धंदे बंद करणार असल्याची ग्वाही पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी नायगाव येथे दिली. वसई जवळील नायगावमध्ये नव्याने बनविण्यात आलेल्या नायगाव पोलीस ठाण्याचे आज उद्घाटन महाराष्ट्र पोलीस दलाचे महासंचालक रजनीश सेठ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी ते बोलत होते. खासदार राजेंद्र गावित, पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय अन्य मान्यवर उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून नायगाव पोलीस ठाण्याचे काम प्रस्तावित असल्याने ते लवकरात लवकर सुरू व्हावे अशी मागणी नागरिकांमधून होत होती अखेर शुक्रवारी १७ मार्चला या पोलीस ठाण्याचे उद्घाटन करून नायगाव पोलीस ठाणे नागरिकांच्या तक्रारीसाठी खुले करण्यात आले आहे. दोन पोलीस निरीक्षक, १४ पोलीस अधिकारी व ४३ कर्मचारी असा स्टाफ या पोलीस ठाण्यात कार्यरत असणार आहे.