पालघर

पावसाळी रानभाज्यांसह चिंबोरी, खेकड्यांना मागणी वाढली

अमृता चौगुले

खानिवडे : पुढारी वृत्तसेवा :  पावसाळा सुरू झाला की रानभाज्या बाजारात येण्यास सुरूवात होते. जंगलातून आणलेल्या या रानभाज्या औषधी असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडते. या भाज्यांबरोबरच चिंबोरी, खेकडेही बाजारात विकायला येत आहेत. रानभाज्या आणि खेकडे या दिवसांमध्ये कमी किंमतीत उपलब्ध होत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक आवर्जुन त्यांची खरेदी करताना दिसतात. रानभाज्या आणि खेकडे, चिंबोरी बाजारात मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत. त्यामुळे खवय्यांची तेथे खरेदीसाठी झुंबड दिसत आहे.

जंगली भाज्या औषधी सुद्धा असतात. तसेच पावसाळ्यापुर्वी इतर भाजीपाला महागलेला असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक या रानभाज्यांना पसंती देतात. पालघर जिल्ह्यातील बहुतांश बाजारपेठेत मोखाडा येथील सुर्यमाळ, जव्हार, विक्रमगड, डहाणू, तलासरी,पालघर, वसई आणि वाडा या डोंगराळ भागातील लोक शेवळी, लोत, कोळीभाजी, बाफली, दिंडे या सारख्या रानभाज्या व खेकडे बाजारात विकायला आणतात. एक जुडी 20 ते 25 रूपयांत अशी रानभाजी विकली जाते. तर नदीचे खेकडे प्रती नग 50 ते 60 रुपयांना तर जंगलातील खेकडे 25 ते 30 रुपयांना विकले जातात.त्यामुळे आदिवासींना रोजगार मिळत आहे.

पावसाळा सुरू होताच खेकडे, रानभाज्या, चिंबोरी व मासे पकडून आम्ही विकत असतो,त्यामुळे आमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सुटतो. दोन पैसे जास्त हाती मिळत असल्याने आम्ही ते जमा करुन इतर सुखसोयी मिळविण्यासाठी प्रयत्न करतो.
-किसन वाघ, आदिवासी बांधव

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT