River Pollution Pudhari
पालघर

River Pollution: वसईमध्ये तलावांवर जलपर्णीचा विळखा; पशु, नागरिक आणि पर्यावरण धोक्यात

जलपर्णी काढण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे: ग्रामीण भागातील तलाव, पाणवठे आणि साठवण जलस्रोतांवर सध्या जलपर्णीने अक्षरशः आक्रमण केले असून या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. अनेक गावांतील तलाव पूर्णपणे जलपर्णीने झाकले गेले असून यामुळे केवळ पर्यावरणीय समतोल बिघडत नाही, तर पशु-प्राण्यांसह स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

तलावाच्या पृष्ठभागावर जलपर्णीचा दाट थर साचल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आणि ऑक्सिजनची देवाणघेवाण थांबते. परिणामी पाणी दूषित होत असून त्याचा थेट परिणाम जलचरांवर होत आहे.

मासे वाढीवर यामुळे परिणाम होत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महसुलचे साधन असलेल्या अश्या तलावांचे लिलाव घेण्यास कोणी पुढे येत नाही.यामुळे ग्रामपंचायतीं व मच्छिमारांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. पारंपरिक मासेमारी व्यवसायावर या संकटाचे सावट स्पष्टपणे दिसून येत आहे.

याशिवाय, तलावांवर पसरलेल्या जलपर्णीमुळे जनावरांना पाणी पिण्यासाठी तलावापर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी जनावरे जलपर्णीत अडकण्याचा धोका वाढला आहे. ग्रामीण भागात तलाव हेच पाळीव जनावरांसाठी प्रमुख पाण्याचे स्रोत असल्याने ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे.

जलपर्णीच्या साठ्यामुळे डास आणि इतर किटकांची मोठ्या प्रमाणात पैदास होत असून त्यामुळे मलेरिया, डेंग्यू यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही परिस्थिती चिंताजनक ठरत आहे.

काही तलावांमध्ये जलपर्णी इतकी दाट झाली आहे की, त्यावर पक्षी जणू काही जमिनीवर चालत असल्याप्रमाणे फिरताना दिसतातही परिस्थिती या समस्येची तीव्रता अधोरेखित करते.ग्रामीण जलस्रोतांचे संवर्धन आणि स्वच्छता ही काळाची गरज बनली असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे.

ठोस उपाययोजनांची आवश्यकता

उन्हाळ्याच्या तोंडावर ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाण्याची पातळी घटत असताना जलपर्णीचा फैलाव अधिक वाढतो आणि उपलब्ध पाणीही वापरण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे पशुधनाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. जलपर्णी काढण्यासाठी तातडीने यंत्रसामग्री, मनुष्यबळ आणि नियोजनबद्ध मोहीम राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT