वाडा : वाडा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा कागदोपत्री दर्जा मिळून अनेक वर्षे उलटली मात्र जागेच्या अडचणीमुळे आजही ग्रामीण रुग्णालयातूनच रुग्णांना सेवा मिळते. अखेर अथक प्रयत्नाने जव्हार वनविभागाकडून अडीच एकर भूखंड मंजूर करण्यात आला आहे. वाडा तालुक्यासह विक्रमगड व अनेकदा जव्हार येथील लाखों रुग्णांना हे रुग्णालय मोठा आधार आहे. उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर झाल्यास ठाणे व मुंबईकडे होणारी फरपट काहीअंशी कमी होईन व याचा गोरगरिब रुग्णांना मोठा लाभ होणार आहे.
वाडा हे तालुक्याचे ठिकाण असून आदिवासी बहुल पट्ट्यासह मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण येथे आहे.तालुक्याची लोकसंख्या जवळपास 2 लाखांच्या आसपास असून ग्रामीण रुग्णालय हे वाडा, विक्रमगड व जव्हार भागातील लाखों रुग्णांना आरोग्य सेवा देते. ग्रामीण रुग्णालय अवघ्या 30 खाटांच्या क्षमतेचे असल्याने प्रचंड भार या रुग्णालयावर आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा असून सुविधांची मोठी अबाल रुग्णांना सहन करावी लागते. ग्रामीण रुग्णालयाचे उपलब्ध वैद्यकीय अधिकारी अशाही परिस्थितीत सेवा देण्याचा प्रयत्न करतात मात्र अटीतटीच्या वेळी रुग्णाला ठाणे व मुंबई येथे जीव धोक्यात घालून जाण्याची वेळ येते.
रुग्णांच्या सेवेचा विचार करता रुग्णालयाला 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्याची मागणी असून मागील चार वर्षांपूर्वी या रुग्णालयाचे कागदोपत्री रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात झाले आहे. रुग्णालय उभारणीसाठी जागा उपलब्ध नसल्याने विस्तारीकरण खोळंबले असून अखेर रुग्णालयाच्या जागेचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी वाडा उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप चव्हाण यांना भूखंडाची पाहणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ही जागा निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान जागेची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आराखडा तयार करून निधीसाठी प्रस्ताव पाठविणार आहे.डॉ. यादव शेखरे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, वाडा