वाडा :वाडा नगरपंचायत क्षेत्रात वैतरणा नदीच्या तीरावर संरक्षक भिंतीची उभारणी केली जात असून ही भिंत अतिशय निकृष्ट व अंदाजपत्रकानुसार होत नसल्याचा आरोप केला जात आहे. संरक्षक भिंतीत लोखंडी जाळी टाकणं गरजेचे असताना कंत्राटदाराने केवळ देखाव्यापुरते लोखंड उभे केले आहे.
भिंतीला तडे जाऊन काही ठिकाणी वेडीवाकडी देखील झाल्याचे दिसत असून दैनिक पुढारीने याबाबत वृत्त प्रसिद्ध करून हा प्रकार उजेडात आणला. अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत कोणतीही खास कारवाई न केल्याने कंत्राटदाराने उलट जोमाने हे काम पूर्णत्वास नेण्याची धडपड सुरू केली असून धोकादायक कामावर कारवाई होणार का असा सवाल विचारला जात आहे.
वैतरणा नदीच्या तीरावर सिद्धेश्वरी येथे वैतरणा नदीच्या महापुरापासून किनाऱ्याचे संरक्षण व्हावे या हेतूने संरक्षक भिंत उभारली जात असून वाडा शहरातील एका राजकीय नेत्याने या कामाचा ठेका तब्बल 1 कोटी रुपयांना घेतल्याची माहिती आहे. दैनिक पुढारीने या कामाची पोलखोल करताच शहरात अनेक झालेल्या निकृष्ट कामांना प्रशासनाने जसे स्विकारले आहे त्याचप्रमाणे आपल्याही कामाला कुणाचे भय नाही या आत्मविश्वासावर कंत्राटदाराने उलट कामाची गती वाढविली आहे.
वेडीवाकडी झालेली भिंत मातीने झाकून घेण्यात आली असून तडा सिमेंटने भरण्यात आल्या आहेत. लोखंडी जाळी अजूनही बघायला मिळत नसून प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. वाडा नगरपंचायत निवडणूक तोंडावर आलेली असतानाही सुरू असणाऱ्या या निकृष्टकामांमुळे वाडा शहरात आजपर्यंत झालेला सावळा गोंधळ किती भयानक असेल याचा प्रत्यय या घटनेतून येतो.
बांधकाम अभियंता भूषण घनवट यांनी कामाची चौकशी करून कारवाई केली जाईल शिवाय काम बंद करावे अशा सूचना कंत्राटदाराला देण्यात आल्याचे स्पष्ट केले होते मात्र काम वेगाने सुरू असल्याने कंत्राटदाराला बळ आहे तरी कुणाचे असा प्रश्न पडला आहे.
आपले म्हणणे काम अंदाजपत्रकानुसार नाही ,मात्र कंत्राटदार म्हणतो काम योग्य आहे व हा पेच सोडविण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार यांना कामाचा अहवाल बनविण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय पुणे येथील एका कॉलेज मधून तपासणी अहवाल घेतला जातो. सर्वांगाने चौकशी करून या कामावर योग्य ती कारवाई केली जाईल.मनोज पष्टे, मुख्याधिकारी, वाडा नगरपंचायत.