कासा : आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत येणाऱ्या अनुदानित आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनीच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. या निवासी आश्रम शाळेची सुरक्षा एका खाजगी महिलेवर गेल्या १३ ते १४ वर्ष सोपवण्याचा प्रताप शाळेकडून करण्यात आला आहे. याबाबत समाजमाध्यमासह, आदिवासी संघटनाकडून रोष व्यक्त केला जात आहे. याबाबत निर्भीड पत्रकार संघ पालघर जिल्हा यांच्या कडून प्रकल्प अधिकारी यांना लेखी तक्रार देण्यात आली आहे. तर याबाबत दै. पुढारीने वृत्त प्रसारित करत प्रशासकीय अधिकारी व शाळा व्यवस्थापन यांना जाब विचारला होता. या प्रकरणाची गंभीर दखल आदिवासी विकास प्रकल्पाकडून घेण्यात आली असून रानशेत आश्रम शाळेवर अधिकाऱ्यांसह, संचालक मंडळाने भेट देत चौकशी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या पालकांनी ग्रामपंचायतीला मुलींच्या सुरक्षेबाबत कळवल्यावर ग्रामपंचायतीने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे बुधवारी लेखी तक्रार करत रानशेत आश्रम शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून एक खाजगी महिला शाळेच्या मुख्यध्यापीकेच्या आशीर्वादाने आपल्या १९ वर्षाच्या मुलांसह मुलींच्या निवास स्थानी तळ ठोकून राहिल्याच्या गंभीर व मुलींच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून आदिवासी विकास प्रकल्पाची व संस्थेची कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी न घेता वास्तव करत असल्याची तक्रार प्रकल्प कार्यालयाला केली आहे. यावेळी रानशेत ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती वरखंडे, उपसरपंच अभिजीत गुहे, सदस्य अनेश मिसाळ, पेसा अध्यक्ष सुनील गुहे उपस्थित होते.
या संपूर्ण प्रकरणामुळे ग्रामस्थांचा वाढता रोष पाहता यांबाबत प्रकल्प कार्यालय मुख्याध्यापीके सह निवासी आश्रम शाळेत अधिक्षिका, मुख्याध्यापक यांच्या काय कारवाई करते का? की आपल्या कर्मचाऱ्यांना अभय देते हे येत्या काळात समजणार आहे. विशेष म्हणजे या आश्रम शाळेतील शालेय समित्या कागदावरच असल्याने येथील विद्यार्थ्याच्या समस्या कधी सुटतील हा मोठा प्रश्नच आहे.