राजेश सावंत
विरार: वसई-विरार शहर अनेक वर्षांपासून पावसाळ्यात पाण्याखाली जाते. पण महापालिका प्रशासनात बसलेल्या अधिकाऱ्यांमध्ये आपण हे शहर पूरमुक्त करावे, अशी मानसिकताच दिसून येत नाही. पाणी का तुंबले, याचे आयआयटी, व्हीजेटीआय, टाटा कन्सल्टन्सी अशा संस्थेमार्फत सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. मात्र ते होत नाही.
वसई-विरार शहराच्या एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला समुद्रकिनारा आहे. त्यामुळे पावसाळ्यात डोंगरावरील पाणी छोट्या नदी व नाल्याद्वारे समुद्राच्या दिशेने वाहत येते.
यावेळी शहरात जोरदार पाऊस व समुद्राला मोठी भरती असेल तर, साहजिकच पाणी शहरात तुंबून राहणार. त्याला ना राजकीय पक्ष, ना प्रशासन रोखू शकत. पण उपाययोजना मात्र करू शकते.
मुसळधार पावसामध्ये शहरात किती प्रमाणात पाणी तुंबते. याचा सविस्तर अभ्यास करून, त्यानुसार पाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत पर्जन्य जलवाहिन्या, नाल्यांची रुंदी व खोली वाढवणे. नवीन नाले निर्माण करणे हे क्रमपात्र आहे.
एवढेच नाहीतर ज्या ठिकाणी बशीसारखा भाग निर्माण झाला आहे. अशा ठिकाणी मुंबईतील हिंदमाता, सायन गांधी मार्केट, मिलन सबवे धर्तीवर भूमिगत पाणी साठवणूक टाक्या बांधणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात शहरांमध्ये नेमके कोणत्या कोणत्या भागात पाणी सर्वाधिक तुंबते. या पाण्याचे प्रमाण किती असेल याचा अभ्यास करून त्या ठिकाणी भूमिगत टाकी उभारल्यास त्या टाकीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात पाण्याचा निचरा करता येऊ शकतो.
जेणेकरून रस्त्यावर तुंबणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. पर्यायाने रस्त्यालगतच्या इमारतीतील घरांमध्ये फिरणाऱ्या पाण्यामुळे होणारा त्रास कमी होऊ शकतो.
केवळ भूमिगत टाकी हाच पर्याय नसून भरतीच्या वेळी शहरात तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी समुद्रकिनारी शक्तिशाली पंपिंग स्टेशन उभारणे आवश्यक आहे.
अशाच उपायोजना वसई विरार महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतल्यास वसई विरार शहरातील लाखो नागरिकांना येणाऱ्या काही वर्षांमध्ये तुंबणाऱ्या पाण्यापासून दिलासा मिळू शकतो.
निरी व आयआयटी तज्ज्ञांच्या नियुक्तीचे फलित काय
वसई विरार २०१८ मध्ये अशीच डुबली होती. त्यावेळीचे आयुक्त सतीश लोखंडे यांनी पर्जन्यजलवाहिनीचा अभाव असून विरार-वसईला पाणी तुंबण्यामागे भरावही तितकाच कारणीभूत आहे.
त्याशिवाय मिठागरच्या जागेपेशा शहरातील काही भाग सकल असल्यामुळे पाणी तुंबत असल्याचे त्यांनी सांगितले होते. एवढेच नाही तर आयआयटी व निरीच्या तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा कसा करता येईल, याचा अभ्यास करणार असल्याचेही सांगितले होते. पण पुढे या समितीच्या अहवालाचे काय झाले. हे कोणालाच माहीत नाही.
या उपाययोजना तातडीने आवश्यक
साठणाऱ्या पाण्याचा अभ्यास करणे
नाल्यांची रुंदी व खोली वाढवणे
नवीन नाले निर्माण करणे
नवीन भूमिगत जलवाहिन्या टाकणे
भूमिगत साठवणूक टाकी
मुंबईच्या धर्तीवर शक्तिशाली पंप
नाल्यांची लांबी समुद्रापर्यंत वाढवणे
कचरा समुद्रात जाऊ नये यासाठी ट्रॅशबूम बसविणे
मुंबई महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती नेमणे
पूरसदृश्य ठिकाण निश्चित करणे