वसई : सलग तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे विरार येथील पापडखिंड धरण ओव्हरफ्लो झाले आहे. या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहराचे महापौर अजीव पाटील यांनी रविवारी (५ जुलै) सकाळी धरणाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दरम्यान बुलेट ट्रेन प्रशासनाचा एक मोठा बेजबाबदारपणा समोर आला आहे.
बुलेट ट्रेन प्रशासनाने वसई-विरार महापालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेताच येथील एका सांडव्यावर रस्ता तयार केल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाची ही चूक अत्यंत गंभीर असून महापौर अजीव पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसह या रस्त्याचीही पाहणी केली व यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी., सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहर अभियंता प्रदीप पांचगे आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
हवामान विभागाने पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने, धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी घ्यावयाची काळजी व उपाययोजनांबाबत महापौर आणि अधिकाऱ्यांमध्ये या वेळी सविस्तर चर्चा झाली.