कासा: वसई-विरार महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून शेकडो तरुण-तरुणींची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कल्पेश जाधव याच्याविरुद्ध डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, विक्रमगड व जव्हार या तालुक्यांतील अनेक सुशिक्षित युवक-युवतींना महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले.
यासाठी आरोपीने प्रत्येकाकडून 18,000 ते 20,000 इतकी रक्कम ‘फोनपे’ व ‘गुगल पे’द्वारे स्वीकारली. अशा प्रकारे शेकडो आदिवासी युवक-युवतींकडून लाखो रुपयांची रक्कम उकळून आरोपी पसार झाल्याचे समोर आले आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितांनी एकत्र येत कोकण विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर पालघर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार सादर करून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक के. ए. गायकवाड करीत आहेत. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून, फसवणूक झालेल्या इतरांनीही पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नोकरीच्या बहाण्याने तरुणांकडून पैसे उकळल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्पेश जाधव याने इतर कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी डहाणू पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.- किरण पवार, पोलीस निरीक्षक, डहाणू पोलीस ठाणे.