वसई : सतत दोन दिवस पडत असलेल्या पावसाने वसेविरार शहराला चांगले झुडपले आहे. सकल भागात सर्वत्र दोन ते अडीच फूट पाणी साचले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वसई पूर्वीचा पांढतारा पूल पाण्याखाली आला आहे. वसई पूर्वेतून वाहणाऱ्या तानसा व वैतरणा नद्यांनी दुथडी भरून वाहण्यास सुरुवात केली असून यंदाच्या हंगामात प्रथमच दोन्ही नद्यांनी किनारे गाठले आहेत. ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू असून, अचानक वीज जाण्याचा फटका शहरालाही बसला. मंत्रालयाकडून आलेल्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन तासांत पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात कुठेही पाणी साचल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी पालिकेने १८००२३३४३५३ आणि १८००२६७३८९८ हे टोल फ्री क्रमांक, तसेच ०२५०-२३३४५४६ / २३३४५४७, ८६६९९७६१०१ आणि ७०५८९११९२५ हे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. याशिवाय महानगरपालिका भवनाच्या ०२५०-६६३०००० आणि २५२५१०१ ते ०६ या क्रमांकांवरही संपर्क साधता येणार आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील यांनी आज स्वतः विरार पूर्व आणि पश्चिम परिसरात उतरून साचलेल्या पाण्याचा आणि उद्भवलेल्या समस्यांचा आढावा घेतला. शहरातील सखल भागात साचलेले पाणी उपसण्यासाठी आणि नागरिकांना मदत करण्यासाठी त्यांनी पालिका प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
शहरात रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना मोठी गटारे असूनही, पाऊस आणि वैतरणा खाडीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत असल्याची वस्तुस्थिती त्यांनी मांडली. महापालिकेचे आयुक्त, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि सर्व नगरसेवक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. महापौरांनी नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे नम्र आवाहन केले असून, त्यांच्या या तत्परतेमुळे त्यांचे उत्तरदायित्व आणि संवेदनशीलता दिसून आली आहे.