वसई : वसईतील धबधबे, समुद्र किनारे, किल्ले आणि अन्य पर्यटन स्थळावर जाण्यास पुढील १० दिवस बंदी घालण्यात आली आहे. पावसाळ्यात घडणाऱ्या अपघाती आणि दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. वसई तालुक्याला विपूल असे ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. एका बाजूला उंच डोंगर-दऱ्या नि त्यातून पावसाळ्यात वाहणारे धबधबे, तर दुसऱ्या बाजूला पसरलेला अथांग समुद्र आणि गोव्याची आठवण करून देणारे विस्तीर्ण किनारपट्टी त्यामुळे वसई विरार मध्ये पर्यटकांची संख्या मोठया प्रमाणावर असते. त्यात विध्यार्थी, युवक-युवतींचा समावेश असतो. वसई-विरार परिसरातील निसर्गरम्य धबधबे, नद्या आणि समुद्रकिनाऱ्यांवर पावसाळ्यात दरवर्षी अनेक दुर्दैवी दुर्घटना घडत असतात.
सुप्रसिद्ध चिंचोटीचा धबधबा, तुंगारेश्वर व पारोळा येथील धबधबे, वसई, अर्नाळा, भुईगाव, राजोडी, कळंब, रानगाव याठिकाणचे समुद्र किनारे या ठिकाणी मान्सून सुरू होताच मोठ्या संख्येने पर्यटक या भागात गर्दी करतात. मात्र, अनेक अतिउत्साही पर्यटक मद्यपान करून पाण्याच्या प्रवाहात जाणे, स्टंटबाजी करणे, उंच ठिकाणाहून पाण्यात उड्या मारणे आणि पाण्याचा अंदाज नसतानाही पाण्यात उतरणे अशा गोष्टी करतात यामुळे बुडण्याच्या आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहात अडकण्याच्या घटना नेहमी घडतात. या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने या पर्यटन स्थळांवर १५ जुलैपर्यंत बंदी घातली आहे.
वसई विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त अशोक वीरकर आणि परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी वसई, नायगाव, वालीव, अर्नाळा, विरार, पेल्हार, मांडवी , बोळींज आणि नालासोपारा पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पर्यटन स्थळांवर 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३' चे कलम १६३ (१) (२) नुसार मनाई आदेश लागू केला आहे. जो कोणी या नियमांचे उल्लंघन करेल, त्याच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.