Expressway News Pudhari
पालघर

Expressway News: वडोदरा ते मुंबई प्रवास चार तासांपर्यंत होणार

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गामुळे वाहतूक व मालवाहतुक होणार वेगवान

पुढारी वृत्तसेवा

पालघर: भारत सरकार मार्फत सुमारे १ लाख कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारा सुमारे १,४०० किलोमीटर लांबीचा, ८ पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड द्रुतगती मार्ग हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या पाच राज्यांना जोडणार आहे.

हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर दिल्ली आणि मुंबई दरम्यानचा प्रवास मोठ्या प्रमाणात वेगवान होणार असून देशातील प्रमुख औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक सक्षम होणार आहे. महाराष्ट्रातील वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 157 किलोमीटरचा भाग 31 ऑगस्ट 2026 रोजी वाहतुकीसाठी खुला होण्यास सज्ज आहे.

देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेल्या दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गाच्या (वडोदरा–मुंबई विभाग) कामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

महाराष्ट्रातील वडोदरा–मुंबई विभाग सुमारे १५७ किलोमीटर लांबीचा असून, त्यासाठी सुमारे २४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. सात बांधकाम पॅकेजमध्ये विकसित होणाऱ्या या विभागातील पाच पॅकेजचे काम पूर्ण झाले असून ते वाहतुकीसाठी सज्ज आहेत, तर उर्वरित दोन पॅकेज ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे.

हा मार्ग सुरू झाल्यानंतर वडोदरा ते मुंबई प्रवासाचा कालावधी आठ तासांवरून सुमारे चार तासांपर्यंत कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांना वेगवान, सुरक्षित आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवासाचा अनुभव मिळणार असून व्यावसायिक वाहतुकीलाही मोठी चालना मिळेल. जेएनपीएकडे जाणाऱ्या मालवाहतुकीची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.

सध्या ठाणे, भिवंडी आणि घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे होणारा वेळ व इंधनाचा अपव्यय कमी होऊन मालवाहतुकीसाठी अधिक जलद आणि विश्वासार्ह पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

उत्तर आणि पश्चिम भारतातील औद्योगिक क्षेत्रांना मुंबईच्या बंदर व्यवस्थेशी अधिक सक्षम जोडणी मिळाल्याने निर्यात, उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. तसेच हा प्रकल्प देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यांना अधिक वेगवान व आधुनिक द्रुतगती मार्गाने जोडणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून, भारताच्या पायाभूत सुविधा विकास आणि आर्थिक प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणारा ठरणार आहे.

लॉजिस्टिक्स आणि उद्योगांवर परिणाम

या एक्सप्रेसवेमुळे मालाची वाहतूक सुलभ होणार आहे, विशेषतः जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (JNPA) कडे जाणाऱ्या मालासाठी. वेगवान आणि थेट मार्गामुळे, उत्तर आणि पश्चिम भारतातील औद्योगिक केंद्रांमधून कच्चा माल आणि तयार उत्पादने वाहून नेणाऱ्या कंपन्यांचा लॉजिस्टिक्स खर्च कमी होण्याची अपेक्षा आहे.

प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळे ट्रकिंग कंपन्यांच्या वाहनांचा अधिक चांगला वापर शक्य होईल, कारण ती कमी वेळेत जास्त फेऱ्या पूर्ण करू शकतील. तसेच, हा नवीन मार्ग ठाणे आणि भिवंडीसारख्या नेहमी वाहतूककोंडीने त्रस्त असलेल्या भागांना टाळण्यासाठी डिझाइन केला आहे, ज्यामुळे व्यावसायिक वाहनांचा इंधन वापर आणि वेळेचा अपव्यय कमी होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT