भिवंडी : पुढारी वृत्तसेवा
भिवंडी महानगरपालिकेच्या क्षेत्रात महानगरपालिकेचे एकूण पाच प्रभाग असून या सर्व प्रभागात काही ठिकाणी नियमित कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांना वेळेवर पाणीपुरवठा होत नाही. मात्र अनेक अनधिकृत इमारतीमध्ये नियमित व वेळेवर पाणी पुरवठा होत असल्याने शहरातील करदात्या नागरिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात उघडकीस आलेले १८९२ अनधिकृत इमारतींचे बांधकाम झाले असून या इमारतींपैकी अनेक इमारतीमध्ये कुटुंबे राहत असून त्या इमारती मधील कुटुंबांना नियमित पालिकेमार्फत पाणी पुरवठा केला जात आहे. अशा अनेक इमारतीमधील कुटुंबाकडून मालमता कर तसेच पाणीपुरवठा कर भरला जात नाही. तर काही अनधिकृत इमारतींना शास्ती न आकारता केवळ महानगरपालिका सेवा देते म्हणून त्यांच्याकडून कर मूल्यांकन विभागातून कर आकारणी केली जात आहे. मात्रअशा अनधिकृत इमारतीच्याआकारणीच्या कर पावतीवर अनधिकृत बांधकामाची नोंद पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केली जात नाही.
भिवंडी महानगरपालिकेच्या क्षेत्रातील महानगरपालिकेच्या जलवाहिनीमधून थेट पाणीचोरी करणाऱ्या पाणीचोरांवर मनपाच्या भरारी पथकाद्वारा कारवाई केली जाते. मात्र शहरातील अनधिकृत बांधकाम केलेल्या इमारतीमधील पाणीचोरांवर प्रभाग अधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजे.- संदीप पटनावर, कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा विभाग
याबाबत अनेक दक्ष नागरिकांनी पालिकेकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. इमारत अनधिकृत शिक्का मालमता कर आकारणी पावतीवर नसल्याने इमारत मालक व विकासक सदनिका अथवा दुकान घेणाऱ्या ग्राहकाची फसवणूक करीत आहे. अशा अनधिकृत बांधकामाच्या इमारतीमधील सदनिका नागरिकांना विकल्यानंतर त्यांना पालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा केल्याचे नुकत्याच पाणी चोरीच्या झालेल्या दोन-तीन कारवाईतून दिसून आलेले आहे. याचा परिणाम शहरातील नियमित कर भरणाऱ्या करदात्यांच्या पाणीपुरवठ्यांवर होऊ लागला आहे.
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात एकूण १८९२ अनधिकृत इमारतीची नोंद झालेली आहे. त्यापैकी काही इमारतींची प्रकरणे न्यायालयात आहेत. तर इतर अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरु आहेत.- अरविंद घोगरे, शहर विकास अधिकारी