पालघर : हनिफ शेख
मित्रपक्ष असो की विरोधी पक्ष जसा पक्ष वाढवण्याचा अधिकार त्यांना आहे तसा पक्ष वाढविण्याचा अधिकार आपल्याला सुद्धा आहे असे सांगत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एक प्रकारे भविष्यात पालघर जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी फोडण्याचे सुतोवाच केल्याची चर्चा आता जिल्ह्यात रंगली आहे. तर मागील महिन्यात भाजपने शिवसेनेचे पदाधिकारी फोडल्याची घटना ही शिवसेनेच्या जिव्हारी लागल्याची बाब यातून समोर येत आहे.
यावेळी बोलताना सामंत म्हणाले की कोणाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका झाली तर माझी सर्व पदाधिकार्यांना सूचना आहे की आपल्या नेत्यावर कुणी टीका करत असेल तर तात्काळ पत्रकार परिषद घेऊन त्या टीकेला उत्तर द्या यासाठी आमची मुभा असल्याचे देखील सामंत यांनी सांगितले. पालघर लोकसभेची शिवसेनेची संघटनात्मक बैठक मनोर येथे पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सामंत बोलत होते.
यावेळी जिल्ह्यातील दोन्ही आमदारांना शाश्वती देताना उद्योग मंत्री सामंत म्हणाले की माझ्या खात्यात शिंदे साहेबांशिवाय कोणीही हस्तक्षेप करत नाही यामुळे आपण काहीही काम सांगा ते केले जाईल. तर पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना 50% उमेदवारी दिली जाईल असेही यावेळी त्यांनी सांगितले.
या बैठकीस राज्याचे रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांनी आपल्या भाषणातून उपस्थित शिवसेनेमध्ये उत्साह भरला.यावेळी गोगावले यांनी जुन्या नव्या वादावर भाष्य करीत नवीन पदाधिकारी येऊन जुन्यांचा जर विसर पडत असेल तर तेही योग्य नाही आणि जुन्यांनी सुद्धा नव्यांना सामावून घेऊन काम केले पाहिजे असे यावेळी ठणकावून सांगितले आम्ही फक्त इथे भाषण करण्यासाठी आलेलो नसून यानंतर या भागाचा येथील परिस्थितीचा अभ्यास करून तशी माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांना पोहोचवणार असल्याची सुद्धा यावेळी सांगितले.
तुम्ही कितीही मोठे असाल मात्र हे सगळं कार्यकर्त्यांमुळे आहोत हे लक्षात ठेवा आणि येणार्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत ज्यांनी आम्हाला निवडून दिले त्यांना निवडून देण्यासाठी आम्ही सुद्धा मेहनत घेऊ अशी हमी यावेळी गोगावले यांनी दिली. या बैठकीत हजर असलेले परिवहनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे संपर्कमंत्री प्रताप सरनाईक यांनी पालघर जिल्हा परिषदेवर भगवा नक्की फडकेल असा आशावाद व्यक्त केला.
पालघर शिवसेनेत अंतर्गत वादाची शक्यता
यावेळी उपस्थित सर्व मंत्र्यांनी व्यासपीठावर येण्या अगोदर एका रूममध्ये पदाधिकार्यांसोबत चर्चा केल्याचे दिसून आले. यानंतर व्यासपीठावरून तिन्ही मंत्र्यांच्या तोंडून जुन्या नव्याने एकत्रित काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या तर मंत्री गोगावले यांनी उपस्थित आमदार विलास तरे आणि राजेंद्र गावित यांना कार्यकर्त्यांसाठी काम करण्याची एक प्रकारे तंबी यावेळी दिली तर सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे भाष्य तीनही मंत्र्यांच्या तोंडून निघाल्याने नक्कीच पालघर जिल्हा शिवसेनेमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे यातून सिद्ध होत असून नव्याने झालेल्या प्रवेशामुळे पक्षात नवा जुना वाद आहे का असा प्रश्न या बैठकीनंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित झाला होता.
जिल्हाप्रमुख कुंदन संखेंचा रोख कोणावर?
या बैठकीची प्रस्तावना करताना जिल्हाप्रमुख कुंदन संख्या यांनी शिवसेनेच्या लोकसभेची जागा भाजपला दिली भाजपचा खासदार पावणे दोन लाखांनी जिंकून आला मात्र जर तोच खासदार शिवसेनेचा असता तर अडीच लाखांनी जिंकून आला असता असे सांगितले जिल्ह्यात खरी ताकद शिवसेनेची असून काही लोक 80 टक्के आम्ही असल्याचे सांगत आहेत मात्र त्यांना रहात असलेल्या आपल्या भागातला आमदार निवडून आणता आला नाही असा अप्रत्यक्षरीत्या टोला भाजप जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांना लावल्याचे यातून दिसून आले याशिवाय आम्हाला एकट्याच्या बळावर लढण्याची आणि भाजप कार्यकर्त्यांचा प्रवेश करवून घेण्याची सुद्धा परवानगी द्यावी अशी मागणी केली.
उद्योगमंत्री सामंत यांचा सुनील तटकरे यांना टोला
सर्वात शेवटी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या बैठकीला संबोधित केले. यावेळी भरत गोगावले यांची प्रशंसा करताना उदय सामंत यांनी गोगावले हे अतिशय माणुसकी वाले असून याबाबतीत त्यांची कोणीही बरोबरी करू शकत नाही असे सांगतानाच नॅपकिन कोणीही फिरवेल पण गोगावले सारखं बोलणं आणि वागणं हे शिकायला हवं असं सांगतानाच तटकरे यांनी काही महिन्यापूर्वी गोगावले यांच्या नॅपकिनची केलेल्या नकलेची एक प्रकारे आठवण करून दिली मात्र हे सांगताना तटकरे यांचा उल्लेख मात्र टाळला. मात्र सामंत यांनी तटकरेंना मारलेला हा टोला उपस्थितांच्या लक्षात आला.