खानिवडे : वेगाने नागरिकीकरण सुरू असलेल्या वसईत रात्रीच्या सुमारास अनधिकृत व नियमबाह्य पद्धतीने चालविल्या जाणाऱ्या रिक्षांना आवर घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने भरारी पथके सक्रिय केली आहेत. मागील काही दिवसांत त्यांच्याकडून करण्यात आलेल्या कारवाईत शेकडो रिक्षांवर कारवाई करीत त्यातील बेकायदेशीर ४५ रिक्षा जप्त केल्या आहेत.
वाढत्या वसई-विरारमध्ये लोकसंख्ये सोबत रिक्षांची संख्या ही बेसुमार वाढली आहे. विशेषतः परवाने खुले झाल्यानंतर खूप प्रमाणात रिक्षा शहरातील रस्त्यावर धावत आहेत. तर दुसरीकडे रात्रीच्या सुमारास शहरात अनधिकृत रिक्षांची चलती जोरात सुरू आहे. कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसलेल्या रिक्षा सर्रास पणे चालविल्या जात आहेत.
कोणत्याही प्रकारच्या कारवाईला सामोरे जावे लागू नये यासाठी हे रिक्षाचालक रात्रीच रिक्षा घेऊन बाहेर पडत आहेत. यातील बहुतांश रिक्षाचालक हे गर्दुल्ले असून मारामारी, अरेरावी या सारखे प्रकार ही घडतात.
रिक्षांचा सुळसुळाट वाढत आहेत. अनधिकृत रिक्षा चालकांच्या विरोधात नागरिक व विविध सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्फत सातत्याने परिवहन विभागाकडे तक्रारी येत होत्या. अखेर प्रादेशिक परिवहन विभागाने रात्रीच्या सुमारास अनधिकृत रिक्षा व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथके सक्रिय केली असूनन रिक्षांची तपासणी सुरू केली आहे.
या तपासणीत परवाना, बॅच, आवश्यक रिक्षांची कागदपत्रे या सर्वांची पडताळणी केली जात आहे. मागील पाच सहा दिवसात साडेसातशेहून अधिक ऑटोरिक्षांची तपासणी केली असून या तपासणीत २४० रिक्षा दोषी आढळून आल्या आहेत. ज्या अनधिकृत आहेत त्या ४५ ऑटोरिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत १७ लाख ६७ हजार रुपये इतका दंड ही वसूल केला असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.