Talathas in Palghar district transferred outside the taluka
पालघर : पुढारी वृत्तसेवा
अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या महसूल विभागातील तलाठ्यांच्या तालुक्या बाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत.जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखड यांनी एकाच तालुक्यात ठाण मांडून बसलेल्या तलाठ्यांच्या बदल्या अन्य तालुक्यात केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. बदल्यांचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.पालघर जिल्ह्यातील 37 तलाठ्यांच्या बदलीचे आदेश जिल्हाधिकार्यांनी नुकताच काढले आहेत.
पालघर जिल्हा अस्तित्वात आल्यापासून अनेक जिल्हाधिकारी येऊन गेले परंतु कोणीही गाव स्तरावर जनतेशी थेट संपर्क असलेल्या तलाठी संवर्गातील कर्मचार्यांच्या बदलीच्या विषयाला हात घातला नव्हता, परंतु जिल्ह्यात प्रथमच मोठ्या संख्येने बदल्या करण्यात आल्या असून बदली प्रक्रियेत कोणताही वशिला कामाला आला नसल्याची चर्चा आहे.त्यामुळे अनेक कर्मचार्यांना नावडत्या ठिकाणी बदल्या मिळाल्या आहेत.
महसूल विभागाच्या गाव स्तरावरील कारभाराबाबत नेहमीच चर्चा होत असते.पालघर तहसील कार्यालयाच्या हद्दीतील महत्वाच्या तलाठी सजेत बदली मिळावी म्हणून अनेकजण प्रयत्नशील होते. तर त्या ठिकाणी कार्यरत असलेले तलाठी अधिक काळ कार्यरत राहता येईल, यासाठी प्रयत्नशील होते.
तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी सेवा करता येत नसतानाही पालघर तालुक्यातील काही तलाठी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत होते. यापैकी काहींच्या कार्यपद्धती बाबत आक्षेप होते.तसेच काहींच्या तक्रारी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी स्तरावर करण्यात आल्या होत्या.
पालघर तालुक्यात कार्यरत उज्वला पाटील, मनीषा कांबळे, नितीन सुर्वे,हितेश आणि नीता साळवे यांची वसई तालुक्यात तर सोपान पवार हितेश राऊत आणि संजय चुरी यांच्या बदल्या डहाणू तालुक्यात करण्यात आल्या आहेत.माहीम तलाठी सजेत कार्यरत रशीद अत्तार यांना सेवा निवृत्ती निमित्ताने मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्हाधिकार्यांच्या यांनी केलेल्या बदल्यांमुळे महसूल विभागाच्या गाव स्तरावरील कारभारात सुधारणा होण्याची शक्यता सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी बदलीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर त्याच ठिकाणी राहण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जातत. तसेच निवासस्थानापासून जवळच्या ठिकाणची बदली मिळवली जात होती.परंतु आवडीच्या ठिकाणी बदलीसाठी प्रयत्नशील असलेल्यांच्या प्रयत्नांवर जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने पाणी फेरले आहे.
सोपान बब्रुवान पवार, संतोष भार्गव शिर्सकर, नरेश कृष्णा नार्वेकर, निलेश भासरा, अमित रमेश राबड, मयुरेश भोईर, सुरेश भिका गारे, उन्चला प्रविण पाटील, मनिषा चंद्रभान कांबळे, हितेश यज्ञेश्वर राऊत, मिलींद अनंता मोकाशी, श्रध्दानंद गायकवाड, विजयकुमार मिंड, दत्ता तुळशीराम डोईफोडे, विष्णु काका जाधव, प्रज्ञा भारत शिंदे, निता गौतम साळवे, अक्षता गायकर, सुषमा दासरवार, संदेश मिठाराम पाटील, देवमन सिरसाट, अनंत रामचंद्र बरफ , भरत नवसू सांबरे, तेजल जाधव, रशिद मोहम्मद अत्तार, निवृत्ती बाळू बांगर, नितिन रामा सुर्वे, सुवर्णा विठ्ठल मोर, संतोष रामचंद्र कोटनाके, स्टारम मुंगूसिंग राठोड, संजय वंसत चुरी, लहानू दाजी महाला, सुरेश जाधव, राजेश पितळे, सुधाकर भिमसेन जाधव, विशाल शिंदे, दिनेश चंद्रकांत पाटील
बदली प्रक्रिये दरम्यान बदलीसाठी पात्र तलाठ्यांकडून तीन ठिकाणचे पसंती क्रम मागवण्यात आला होता.पसंतीच्या ठिकाणच्या तीन पैकी एका ठिकाणी बदली करण्यात आली आहे.कर्मचार्यांच्या कामाचे निरीक्षण करून बदल्या केल्याचे दिसून येते.