तलासरीत चिखल तुडवीत विद्यार्थी गाठतायेत शाळा  pudhari photo
पालघर

Talasari rural education challenges : तलासरीत चिखल तुडवीत विद्यार्थी गाठतायेत शाळा

प्रशासनाचे दुर्लक्ष, नदीवर पूल, रस्त्याची ग्रामस्थांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

तलासरी : तलासरी तालुक्यातील सूत्रकार बेंडगपाडा येथील नागरिकासह विद्यार्थ्यांना चिखलातू मार्ग काढत धडे घेण्यासाठी शाळा गाठावी लागत आहे. पावसाळ्यात आपला जीव मुठीत घेवून ओहळ पार करून चिखलातून मार्ग काढत विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे चित्र दिसत आहे.

तलासरी तालुक्यातील सूत्रकार गावातील बेंडगपाडा या 550 ते 600 लोकवस्ती असलेल्या आदिवासी पाड्यामध्ये पावसाळ्यामुळे दळणवळणाची साधने पूर्णपणे ठप्प झाली आहेत. सूत्रकार गावातील कालू नदीच्या पलीकडे वसलेल्या या वस्तीत पोहोचण्यासाठी एकमेव पायवाट वगळता कोणताही पक्का रस्ता नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच हा एकमेव मार्ग पूर्णपणे चिखलाने भरलेला असून मार्गात असलेली काळू नदी पावसात दुथडी भरून वाहत असून यामुळे येथील रहिवाशांना, विशेषतः विद्यार्थ्यांना, मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काळू नदी वर पुल बांधून मिळावा अशी मागणी होत असून अनेकवेळा ठराव घेवूनही पुल आणि रस्ता केला जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक केला आहे.

तलासरी तालुक्यातील सूत्रकार बेंडगपाडा येथे सुमारे 600 लोकवस्तीच्या गावापाडयाला जोडणारा बेंडगपाडा ते काटेलपाडा सुमारे अडीच ते तीन किमी कचा रस्ता असून या रस्त्यावरून जिल्हा परिषद शाळा, आश्रम शाळा व इतर शाळा येथील असलेल्या शाळेत शेकडो विद्यार्थी जीव मुठीत घेवून नदी ओहळाच्या प्रवाह आणि चिखलातून मार्ग काढत शाळेत जात असतात. परंतु पावसाळ्यात मांडीभर चिखलातून चपळ, सेन्डल आणि बूट हातात घेवून मार्ग काढावा लागत आहे. शिवाय कधी पूर्ण कपडे चिखलाणी माखले की मुलांना शाळेत जाता येत नाही. बेंडगपाडा येथील आदिवासी मुले दोन किलोमीटर चिखलातून पायी प्रवास करून शिक्षण घेतना दिसत आहेत. पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन का असेना मात्र आजही आदिवासी समाजाची मुले शिक्षणासाठी धडपड करीत आहेत.

या रस्त्याबाबत अनेक वर्षापासून अनेकवेळा तक्रार अर्ज आणि ग्रामपंचायतीचे ठरावही घेण्यात आले होते. हे ठराव पंचायत समिती आणि स्थानिक आमदारांनाही देण्यात आले होते. मात्र याकडे आदिवासींच्य विकासाच्या मोठ-मोठ्या गोष्टी करणारे शासन आणि स्थानिक नेते मंडळी यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

कोट्यावधी रुपये शासनाने आदिवासींच्या विकासासाठी खर्च केले मात्र प्रत्यक्ष आजही आदिवासी या विकासापासून कोसो दूर असून त्यांची उपेक्षाच झाल्याचे चित्र आजही सर्वत्र दिसत आहे. दरम्यान दोन किलोमीटर चिखलातून शाळेत जावे लागते.

पाऊस जास्त असल्यावर पाठीवर दप्तर एका हातात छत्री आणि दुसर्‍या हातात बूट चपळ घेऊन जावे लेगते. त्यामुळे कधी शाळेत जायला उशीर होतो तर कधी चिखलाने कपडे खराब झाले तर शाळेला दांडी पडते. अशी खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

बेंडगपाडा येथील तक्रार प्राप्त झाल्यानंतर सरपंचासह त्याठिकाणी भेट दिली. सध्या रस्ता चिखलमय झाला असून पाड्याच्या शेजारून वाहणार्‍या ओढ्यामधून वाट काढावी लागत आहे. ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेता मुरून टाकून, लवकरच येथे नवीन रस्त्यासाठी प्रस्ताव पाठवला जाईल. ओढ्याच्या ठिकाणी पुलाची आवश्यकता असून यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून पाठपुरावा केला जाईल.
राजेंद्र गायकवाड, ग्रामविकास अधिकारी, सूत्रकार
ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. कळू नदीवर पूल बांधून मिळावा अशी मागणी अनेक वर्षापासून आम्ही ग्रामस्त करीत आहोत. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
सुनील बेंडगा, ग्रामस्थ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT