सावधान, भटक्या श्वानांचा उपद्रव वाढतोय  pudhari photo
पालघर

Palghar News : सावधान, भटक्या श्वानांचा उपद्रव वाढतोय

चार महिन्यात 385 जणांना श्वानदंश

पुढारी वृत्तसेवा

पालघर ः मनोर शहरासह ग्रामीण भागातील भटके श्वान लहान मुलांसह दुचाकी स्वारांवर हल्ले करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत मनोर ग्रामीण रुग्णालयात श्वानदंश झालेल्या 385 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्याय सर्वाधिक 125 श्वानदंश झालेले रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आले होते.निर्बीजीकरणासह अन्य उपाययोजना केल्या जात नसल्याने भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.भटक्या कुंत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात जून महिन्यात 82,जुलै मध्ये 104 तर ऑगस्ट महिन्यात 125 आणि सप्टेंबर महिन्याय 71 श्वान दंश झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले.चार महिन्यांच्या कालावधीत 385 जणांना श्वानदंश झाला आहे.सर्वाधिक श्वानदंश मनोर शहरातील नागरिकांना झाल्याचे ग्रामीण रुग्णालयातील आकडेवारीवरून समोर आले आहे.गेल्या काही वर्षांच्या तुलनेत श्वानदंश होण्याचे प्रमाण वाढले आहे.

मनोर ग्रामपंचायत हद्दीतील बस स्थानक,नवी वस्ती,मासळी मार्केट, ख्वाजा नगर, आंबेडकर नगर, रईस पाडा, खाजा नगर डोंगरी,मस्जिद गल्ली, गायकवाड डोंगरी, हायस्कूल डोंगरी आणि पोलीस ठाण्याच्या परीसरात भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. दोन दिवसांपूर्वी दहा वर्षाच्या मुलीवर भटक्या श्वानांनी हल्ला केला होता.स्थानिकांनी मुलीची कुत्र्यांच्या हल्ल्यातुन सुटका केली होती.

ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांचा प्रजनन दर नियंत्रणात आणण्यासाठी निर्बीजीकरणा सारख्या उपाययोजना करण्याच्या मर्यादा येत आहेत. उघड्यावर टाकलेले अन्न तसेच चिकन विक्रेत्यांकडून कोंबड्यांचे अवयय आदी कारणांमुळे भटक्या कुत्र्यांना नियमित खाद्य पुरवठा होत असल्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या झापाट्याने वाढत आहे.विणीच्या हंगामात भटके श्वान हींस्र होत असल्यामुळे श्वान दंशाच्या घटनां मध्ये वाढ होत असते.

गेल्या काही वर्षांपासून भटक्या श्वानांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे शहरासह ग्रामीण भागात भटक्या श्वानांची समस्या अधिक गंभीर झाली आहे. वाहनांवरून जाणार्‍यांच्या अंगावर धावून जाणे मागील वर्षी बालकांच्या मागे लागून चावा घेण्याचे प्रकार सातत्याने वाडले होते.असेच प्रकार आता होत असल्याने ग्रामपंचायत स्तरावर श्वानदंश रोखण्यासह भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

विणीच्या हंगामात भटके श्वान घोळक्याने रस्त्यावर फिरत असतात, तसेच अधिक हिंस्र झालेले असतात,भरधाव वेगातील दुचाकीच्या समोर भटके श्वान आल्याने अपघात घडून दुचाकीस्वार जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे.भटक्या श्वानांमुळे चार चाकी वाहनांचे नुकसान होत असते. धावत्या वाहनांवर धावून जाणे,लहान मुलांच्या मागे लागून चावा घेण्याचे प्रकार वाढले आहेत.

श्वान पकडण्यासाठी सुविधा उपलब्ध नाहीत.जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकार्‍यांकडे भटके श्वान पकडण्याच्या गाडीची मागणी केली आहे.गाडी उपलब्ध झाल्यानंतर भटक्या श्वानांचा बंदोबस्त करता येईल.
नितीन पवार, ग्राम पंचायत अधिकारी, मनोर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT