खानिवडे : वसई विरार महानगरपालिकेने शहराची शोभा वाढावी म्हणून अनेक ठिकाणी सौंदर्यीकरण केले आहे. मात्र यामध्ये शहर स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी वसई विरार महापालिकेने अतिकचर्याच्या ठिकाणांचे सौंदर्यीकरण केले आहे. यामुळे तेथे कचरा टाकला जाणार नाही व शहर स्वच्छ राहील हा उद्धेश आहे. मात्र केलेल्या या सौंदर्यीकरणानंतर ही त्या ठिकाणी कचरा आणून टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. याशिवाय याच ठिकाणी उभी केलेली शिल्प ही देखभाली अभावी काळवंडली आहेत. महापालिकेकडून होत असलेला देखभालीचा अभाव असल्याने हे सारे चालले असल्याचे नागरिक सांगत आहेत.
वसई विरार शहरातील काही ठिकाणी सातत्याने कचरा टाकला जात होता. या कचर्यामुळे आजूबाजूचा परिसर हा दुर्गंधीयुक्त होत होता. यामुळे नागरिकांचे आरोग्य ही धोक्यात येण्याची शक्यता आहे. तसेच या वाढत्या कचर्यांच्या ढिगार्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत होते. यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने अशा ठिकाणांचे सर्वेक्षण केले होते. ज्या ठिकाणी जास्त कचरा टाकला जातो व सातत्याने तो परिसर कचर्याने वेढलेला असतो.अशा परिसराची स्वच्छता अबाधित राहावी व नागरिकांना मोकळा श्वास घेता यावा या उद्देशाने पालिकेने ही ठिकाणे सौंदर्यीकरणात आणली आहेत.
यात विविध प्रकारची आकर्षक शिल्प तयार करून त्यात रोषणाई केली आहे. यासाठी महापालिकेने कोट्यावधी रुपये निधी खर्च केला होता. परंतु काही ठिकाणच्या भागात सौंदर्यीकरण केलेल्या ठिकाणांच्या समोरच कचरा आणून टाकण्याचे प्रकार सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे.यामुळे या प्रकाराकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याने अशी अवस्था झाली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याशिवाय जी शिल्प लावली आहेत त्यांची देखभाल नीट होत नसल्याने ती सुद्धा काळवंडून गेली आहेत.