पालघर : पालघर तालुक्यातील माहीम ग्रामपंचायत हद्दीतील सावरेपाडा ते चौकीपाडा या अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली असून या रस्त्यावर असलेला साकवही धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे या रस्त्याची आणि साकवाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी माहीम ग्रामपंचायतने केली आहे. माहीम ग्रामपंचायतच्या सरपंच प्रीती पाटील, उपसरपंच नरोत्तम पाटील, सदस्य कुणाल नारले यांनी उपजिल्हाधिकारी महेश सागर यांना निवेदन देत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
पालघर तालुक्यातील माहीम-सावरेपाडा ते चौकीपाडा मार्गावरील रस्ता आणि त्यावरील साकवावरून मोठ्या प्रमाणात वजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले असून रस्त्यावर साकवही धोकादायक स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. साकव कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक मार्गाचा वापर दररोज करत असून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावरून दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मोठा त्रास सहन करावा लागत असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून रस्ता आणि साकवाची दुरुस्ती करावी तसेच भविष्यात अशा प्रकारची हानी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी माहीम ग्रामपंचायतच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.