वाडा : जंगलातील वन्यजीवांसह पशुपक्ष्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने परळी वन्यजीव विभागात जागोजागी काँक्रीटची लहान तळी उभारण्यात आली आहेत. वन विभागाच्या भोंगळ कारभाराने तळ्यांमध्ये मात्र पाण्याचा थेंब बघायला मिळत नसून यामुळे वन्यजीव मात्र तहानेने व्याकुळ झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे. अधिकारी व कर्मचारी याबाबत फारसे गंभीर नसल्याचे बघायला मिळत असून वन्यजीवांच्या हितासाठी केल्या जाणाऱ्या जाहिराती मग केवळ बतावण्या आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे.
परळी वन्यजीव परिक्षेत्रात चार परिमंडळ असून उन्हाळ्यात वन्यजीवांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण रोखता यावी यासाठी सिमेंटची कृत्रिम तळी बांधण्यात आली आहेत. खरेतर ही तळी कायम पाण्याने भरलेली असावीत जेणेकरून प्राण्यांना व पक्षांना कडक उन्हाळ्यात दिलासा मिळेल. परळी विभागातील अनेक तळी मात्र कोरडी पडलेली बघायला मिळत आहेत.
शासनाकडून असे पाणवठे बांधून त्यात पाणी टाकण्यासाठी निधी उपलब्ध होतो, मग हा निधी कुणाच्या घशात जातो असा सवाल विचारला जात आहे. वाडा तालुक्यात सध्या कडक उष्णता पडत असून तापमान 40 पार पोहोचले आहे.
जंगलात पाण्यासाठी बांधण्यात आलेले सिमेंट बंधारे आधीच निकृष्ट कामांमुळे कोरडे पडलेले असून याबाबत वन विभागाला काहीही देणंघेणं आहे असे दिसत नाही. परिणामी प्राण्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून कृत्रिम व्यवस्था देखील कुचकामी ठरल्याने मुक्या जनावरांना हाल सोसावे लागत आहेत.