हनिफ शेख
पालघर: आदिवासीबहुल पालघर जिल्हा सिकलसेल या अनुवांशिक रक्ताच्या आजाराच्या विळख्यात अडकला आहे. आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 591 सिकलसेल रुग्ण आढळले आहेत, तर 18 हजार 694 नागरिक सिकलसेल वाहक आहेत.
सिकलसेल आजाराची तालुका न्याय रुग्णसंख्या पाहिल्यास डहाणू तालुक्यात या आजाराचे प्रमाण मोठे असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे कुपोषण,माता मृत्यू, बालमृत्यू सारख्या घटना जिल्ह्यात घडत असतानाच आता सिकलसेल सारख्या आजाराने देखील पालघरला घेरले असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
सिकलसेल हा आजार आई-वडील दोघेही वाहक असतील तर मुलांना होतो. वाहक व्यक्तीला आजाराची लक्षणे दिसत नाहीत, पण तो आजार पुढच्या पिढीत जाऊ शकतो. पालघर जिल्ह्यातील मोठी लोकसंख्या आदिवासी आहे यामध्ये सिकलसेलचे प्रमाण अधिक आढळते.
1 हजार 591 रुग्ण म्हणजे त्यांना आयुष्यभर रक्त संक्रमण, वेदनेचे झटके, अशक्तपणा यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. तर 18 हजार 694 वाहक म्हणजे ही एक टाइमबॉम्ब आहे.
जर दोन वाहकांचे लग्न झाले तर त्यांच्या मुलाला 25% सिकलसेल होण्याचा धोका असतो. हा आजार संसर्गजन्य नाही (म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला स्पर्श केल्याने होत नाही). आई आणि वडील दोघांनाही सिकलसेलचा जनुकीय दोष (Gene defect) असेल, तरच होणाऱ्या मुलामध्ये हा आजार पूर्णपणे उतरतो.
जर एकाच पालकाकडून दोषपूर्ण जनुक मिळाले, तर त्या व्यक्तीला फक्त सिकलसेलचे 'वाहक' (Carrier) म्हणतात, ज्याला सहसा आजाराची लक्षणे नसतात.उपचार आणि उपाय:हा आजार पूर्णपणे बरा करणे कठीण असले, तरी योग्य औषधोपचार आणि जीवनशैलीच्या बदलांनी रुग्ण निरोगी आयुष्य जगू शकतात.
वेदनाशामक औषधे आणि भरपूर पाणी पिऊन वेदना कमी करता येतात.नियमित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.भावी पिढीत हा आजार रोखण्यासाठी लग्नापूर्वी रक्त तपासणी आणि अनुवांशिक समुपदेशन (Genetic Counseling) करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.डॉक्टरांच्या मते, "सिकलसेलचा एकमेव उपाय म्हणजे जनजागृती आणि विवाहपूर्व तपासणी.
लग्नाआधी मुला-मुलीची 'सिकलसेल स्क्रिनिंग' झाली तर हा आजार पुढच्या पिढीत जाण्यापासून रोखता येतो. पण ग्रामीण भागात अजूनही याबद्दल जागरूकता कमी आहे." सरकारकडून देखील या आजारासाठी विविध उपाय योजना अगदी मोफत राबविल्या जातात यामुळे या आजाराबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे.
राज्य सरकारने सिकलसेल नियंत्रणासाठी मोफत तपासणी, औषधे आणि विशेष सिकलसेल सेल सुरू केले आहेत. पालघरच्या ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी मोफत होते. शासकीय योजनेतून रुग्णांना औषध आणि रक्त संक्रमणाची मदत मिळते.
सिकलसेल म्हणजे काय?
हा अनुवांशिक आजार आहे. यात लाल रक्तपेशी हसियाच्या आकाराच्या होतात. त्यामुळे शरीरात रक्तपुरवठा कमी होतो आणि तीव्र वेदना, अशक्तपणा जाणवतो आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे तीव्र वेदना (सिकल सेल क्रायसिस) हात-पाय, छाती आणि सांध्यांमध्ये अचानक असह्य वेदना होतात.
अशक्तपणा (ॲनिमिया) लाल रक्तपेशींचे आयुष्य १००-१२० दिवसांऐवजी फक्त १०-२० दिवसच असते. त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासते आणि सतत थकवा जाणवतो.संक्रमण आणि सूज: वारंवार ताप येणे, हात-पायांना सूज येणे आणि फुफ्फुस, यकृत व मूत्रपिंडासारख्या अवयवांवर परिणाम होणे.
आरोग्य विभागाने आवाहन केले आहे की, लग्नापूर्वी मुला-मुलीने रक्त तपासणी करून घ्यावी. जर दोघेही वाहक निघाले तर समुपदेशन करून निर्णय घ्यावा. तसेच सिकलसेल रुग्णांनी पाणी जास्त प्यावे, थंडी-उष्णतेपासून बचाव करावा आणि नियमित तपासणी करावी. तसेच या आजाराबाबत पालघर जिल्हा आरोग्य विभाग गंभीर असून या संदर्भात योग्य ती खबरदारी आमच्या विभागाकडून घेतली जात आहे.- संतोष चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर.