पालघर : हनिफ शेख
मोखाडा मधील टाकपाडा गावातील पशुपालक शेतकरी नवसु दिघा यांनी आपल्या पारंपरिक शेतीला जोडव्यवसाय म्हणून सन २०२२ मध्ये बँक ऑफ बडोदा या मोखाडा शाखेतून जवळपास बारा लाखांचे कर्ज घेऊन दहा दुधाळ म्हैस खरेदी केल्या तसेच चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनीकडून या म्हैसींना भविष्यात काही समस्या उद्भवल्यास बँकेकडून विमा कवच सुद्धा घेतले होते. परंतू म्हैस खरेदी केल्यानंतर वर्षे दोन वर्षात त्यांच्या तबेल्यातील दोन म्हैसी मेल्या आहेत. विशेष म्हणजे या म्हैसीसाठी चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनीचा विमा काढला होता तरी देखील त्यांना विम्याची नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे नुकसान भरपाईचे पैसे द्या नाहीतर तुम्ही दिलेली म्हैस परत घ्या यासाठी मेलेली म्हैस ट्रॅक्टर मध्ये आणून बँकेच्या समोर ठेऊन आपला रोष व्यक्त केला आहे.
शेतकरी नवसु दिघा यांच्या तबेल्यातील पहिली म्हैस २०२३ मध्ये मेली आणि दसरी म्हैस ३० ऑक्टोबर २०२५ रोजी मृत्यूमुखी पडली आहे. मात्र विमा काढलेला असतानाही मोखाडा बँक ऑफ बडोदा शाखेच्या आडमुठे कर्मचाऱ्यांमुळे दोन वर्षांपूर्वीचे नुकसान भरपाईचे पैसे नवसु दिघा यांना मिळालेले नाहीत आणि आता मेलेल्या म्हैसीचे पण पैसे मिळणार नाहीत म्हणून दिघा यांनी आपली मेलेली म्हैस ट्रॅक्टरमध्ये भरुन बँकेच्या समोर आणून ठेवली होती. एकतर मला इन्शुरन्सचे पैसे द्या नाहीतर तुम्ही दिलेली म्हैस परत घेऊन टाका अशी भुमिका घेतली होती. त्यामुळे काहीकाळ बँकेत तणावाचे
वातावरण निर्माण झाले होते. मोखाडातील बैंक ऑफ बडोदा शाखेतील कर्मचाऱ्यांकडून नेहमी ग्राहकांची फसवणूक केली जाते असा आरोप सुध्दा यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे दोन वर्षांपूर्वी घोसाळी गावातील शेतकरी मधू माळी, गुंबाडपाडा गावातील शेतकरी आंबेकर यांनी देखील बँक ऑफ बडोदा शाखेतून कर्ज घेऊन म्हैसी खरेदी केल्या होत्या त्यांच्या म्हैसी मरुन दीड वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे तरी सुद्धा त्यांना ही विम्याची नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही.
बँकेकडून शेतकऱ्यांची फसवणूक ?
मागील काही वर्षांपूर्वी बँक ऑफ बडोदा मोखाडा शाखेतून म्हैस खरेदी करण्यासाठी घेतलेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकदाही म्हैस मेल्यानंतर विम्याची रक्कम मिळालेली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तर याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे म्हैस खरेदी केल्यानंतर वर्षेभरात ती म्हैस मेली तरी सुद्धा घेतलेले कर्ज हे व्याजासह पशुपालक शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने वसुली केले जात आहे. त्यामुळे बँक ऑफ बडोदा शाखेतील कर्मचाऱ्यांकडून अशीच जबरदस्ती चालू राहीली तर काही पशुपालक शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा विचार करावा लागेल इशारा दिला आहे.
मी एकतीस दिवसांत नवसु दिघा यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाईचे पैसे मिळवून देतो. तसेच इतरही नुकसानग्रस्त पशुपालक शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला विमा कंपनीकडून मिळवून देणार आहे असे लेखी स्वरूपात लिहून देतो.वरीष्ठ ऑफिसर, बैंक ऑफ बडोदा मोखाडा शाखा.
माझ्या आतापर्यंत दोन म्हैसी मेल्या आहेत. बँकेकडे याआधी पण नुकसान भरपाई मिळावी म्हणून म्हैसीचा पोसमार्टम रिपोर्ट आणि इतर कागदपत्रे जमा केली होती तरी नुकसान भरपाई मिळाली नाही. आता एकतीस दिवसांत विम्याचे पैसे मिळाले नाहीतर बैंक समोर उपोषण करु,नवसु दिघा, नुकसानग्रस्त पशुपालक शेतकरी.