खोडाळा : मोखाडा तालुक्यातील मौजे काष्टी या अतिदुर्गम गावावर बिबट्याची वक्रदृष्टी अधिक गडद झाली असून शुक्रवार दि 5 रोजी एका सवत्स गायीचा बळी घेतल्यानंतर रविवार दि 7 रोजी सायंकाळी 7 ते 07-30 च्या दरम्यान येथीलच भास्कर बोटे यांच्या गायीवर बिबट्याने लक्ष साधले असून तीचाही बळी घेतला आहे.हल्लेखोर बिबट्या पुन्हा एकदा मोखाडा तालुक्यातील जंगल पट्ट्यात चांगलाच सक्रिय झाला असून तो शेतकऱ्यांच्या दुधदुभत्या गोवंशाची शिकार करत असल्याने शेतकऱ्यांमधून चिंतेचे वातावरण आहे.
तालुक्यातील मौजे काष्टी येथील चंद्रभागा अर्जून भोईर या आदिवासी शेतकऱ्याची गाभण गाय शुक्रवार दि 5 रोजी सुर्यमाळ बाजूकडून येताना बिबट्याच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडली आहे.अवघ्या 1 ते 2 दिवसांत ही गाय जनली असती.तर लगेचच एक दिवसा आड रविवारी बोटे यांच्या गायीवर किनीस्ते पैकी वडपाडा भागातून चरुन येतांना हल्ला केला यात बोटे यांची गाय मृत्युमुखी पडली आहे.
तानसा वन्यजीव अभयारण्य (तानसा वाईल्डलाईफ सैंक्चूअरी) हे प्रामुख्याने शहापूर, वाडा, भिवंडी आणि मोखाडा तालुक्यांमध्ये विस्तारलेले आहे. मोखाडा तालुक्यातील आमले, सुर्यमाळ,केवनाळे, काष्टी, सावर्डे आदी गाव या अभयारण्याच्या क्षेत्रात प्रामुख्याने प्रस्तावित आहेत. तसेच गारगाई धरण प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, अभयारण्याच्या सीमेवर खोडाळा आणि सूर्यमाळ (जे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे) हीही गावे आहेत. त्यामूळे बिबट्याचा तालुक्यात मुक्तपणे संचार असतो.त्यात शेतकऱ्यांना आपली जनावरं गमवावी लागत आहेत.मात्र वन्यजीव संरक्षण विभागाला त्यांच्या कडे असलेल्या "मानव आणि वन्य प्राण्यांमधील संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करणे." या जबाबदारीचा सोयीस्कर विसर पडलेला आहे.
मोखाडा तालुक्यात दरवर्षी बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांची कामाची आणि कमाईची जित्राबं सर्रासपणे दगावत आहेत. बिबट्याच्या हल्ले वाढल्यावरच एआय सारखे तंत्रज्ञानाचा गाजावाजा करत अवलंब करणारे वनविभाग प्रकरण शांत होताच कार्यवाहीशुन्य होत असल्याने बिबट्याच्या हल्ल्यापासून अगदी मानवही सुरक्षीत राहिलेला नाही. कारण मागील वर्षीच दुचाकीस्वार बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावलेला आहे.एकूणच अभयारण्य परिसर असला तरी बिबट्याचा वावर दुर्लक्षून चालणार नसल्याने वनविभागाने आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी सावर्डे ग्रामपंचायतीचे उपसरपंच हनूमंत पादीर यांनी जव्हार येथील उपविभागीय वन अधिकारी यांचेकडे केली आहे.