मनवेलपाडा : पालघर जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये श्रीकृष्ण जयंतीसाठी तसेच बाळगोपाळांच्या दहीहंडीसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच विविध ठिकाणच्या मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सवाची तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे दहीहंडी फोडण्यासाठी चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच उत्साह शिगेला पोहोचला असून साहित्य खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आहेत.
दहीहंडीचा उत्सव जवळ येताच बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोपाळकाला आणि दहीहंडीच्या पारंपरिक सोहळ्यासाठी लागणाऱ्या मडक्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली असून, विविध रंगांनी सजलेली आणि आकर्षक नक्षीकाम केलेली मडकी बाजारात लक्ष वेधून घेत आहेत.
विविध ठिकाणच्या कुंभार कारागिरांनी वर्षानुवर्षे जपलेल्या पारंपरिक कलेला दहीहंडीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मागणी वाढली आहे. साध्या मडक्यांपासून ते रंगीबेरंगी, नक्षीदार आणि विविध आकारांतील मडक्यांपर्यंत अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीनुसार विविध पर्याय पाहायला मिळत आहेत.
तसेच वसई परिसरातील काही कुंभार कुटुंबे तब्बल ७० वर्षांपासून मातीची भांडी आणि मडकी तयार करण्याचे काम करत आहेत. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली ही कला आजही पारंपरिक पद्धतीने जपली जात आहे. माती निवडण्यापासून मडके तयार करणे, ते भाजणे आणि त्यावर आकर्षक रंग व नक्षीकाम करण्यापर्यंतची प्रक्रिया कारागिरांकडून मेहनतीने केली जाते.
दहीहंडीच्या काळात या मडक्यांना विशेष मागणी असते. त्यामुळे उत्सवाच्या काही दिवस आधीपासूनच कारागिरांकडून मडक्यांची मोठ्या प्रमाणात तयारी केली जाते. यंदाही विविध रंगसंगती आणि आकर्षक नक्षीकाम असलेल्या मडक्यांनी बाजारपेठ सजली आहे. ग्राहकांच्या बजेटनुसार मडक्यांच्या किमतीतही विविधता आहे. बाजारात साधारण शंभर रुपयांपासून ३५० रुपयांपर्यंत नक्षीदार आणि रंगीत मडकी उपलब्ध आहेत. आकार, नक्षीकाम आणि सजावटीच्या प्रकारानुसार त्यांच्या किमती बदलतात.
विशेषतः दहीहंडीचे आयोजन करणारे मंडळे, गोविंदा पथके तसेच घरगुती उत्सवासाठी मडकी खरेदी करणारे नागरिक बाजारात येत आहेत. पारंपरिक मातीच्या मडक्यांना आधुनिक रंगसंगतीची जोड मिळाल्याने त्यांचा आकर्षकपणाही वाढला आहे.
पारंपरिक कलेला उत्सवाची साथ
आजच्या आधुनिक काळात विविध प्रकारची सजावटीची साधने उपलब्ध असली, तरी दहीहंडीच्या उत्सवात मातीच्या मडक्याचे महत्त्व कायम आहे. त्यामुळे कुंभार कारागिरांच्या हाताला या काळात चांगले काम मिळते. उत्सवाच्या माध्यमातून त्यांच्या पारंपरिक कलेलाही बाजारपेठ मिळत असल्याने कारागिरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.