Palghar Paddy Crop Loss
खानिवडे : पालघर जिल्ह्यात हवामान खात्याने केलेला अंदाज खरा ठरवत शनिवारी रात्री नऊ वाजल्यापासून विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि जोरदार पावसाची संततधार सुरू झाली. हा पाऊस रविवारीही अखंडपणे सुरू होता. त्यामुळे नद्या, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले असून जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे. नुकतीच कणसे बाहेर आलेली आणि परिपक्वतेला आलेली हळवी शेती पावसाच्या तडाख्याने आडवी झाली. यामुळे शेतकऱ्यांचा ‘हातात आलेला घास’ चिखलात गेला आहे. निमगरवी शेतीही कणसांनी बहरलेली असतानाच अनेक ठिकाणी पाण्याखाली जाऊन आडवी झाली आहे. तर गरवी भातशेतीलाही पाण्यामुळे धोका निर्माण झाला आहे.
यंदा सतत पावसाचे आणि ढगाळ हवामानाचे वातावरण असल्याने भातशेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे शेतकरी सांगतात. परिणामी भात उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात केलेली लागवड, बांधबंदिस्ती, भात पेरणी, मशागत, खत-औषधे, मजुरी यासाठी शेतकऱ्यांनी केलेला चार महिन्यांचा आटापिटा अक्षरशः वाहून जात असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत.
पावसामुळे केवळ शेतीच नव्हे तर दैनंदिन मजुरीवर उदरनिर्वाह करणारे नागरिक, कारखान्यात काम करणारे कामगार, बाजारात भाजीपाला-धान्य नेणारे शेतकरी, रानभाज्या विक्रेते यांचेही काम ठप्प झाले. त्यामुळे त्यांचे रोजचे उत्पन्नही बुडाले आहे.
“हळवी शेती गेलीच आहे. निमगरवी आणि गरवी शेतीलाही पाणी घुसल्याने दाणेविरहीत भात येण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. शासनाने तातडीने पाहणी करून नुकसानभरपाईसह शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.”- लक्ष्मीप्रसाद पाटील शेतकरी, आडणे, वसई पूर्व