पालघर: पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून डहाणू, तलासरीसह अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांत तलासरीत तब्बल ५८० मिमी पावसाची नोंद झाली असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला असून शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
सूर्या, वैतरणा, वांद्री, देहेरजा आदी नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली असून मनोर-नाशिक मार्गही बंद करण्यात आला आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झाडे व वीजखांब कोसळल्याने शेकडो गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून मोबाईल नेटवर्कवरही परिणाम झाला आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एनडीआरएफ आणि वसई-विरार महापालिकेची बचाव पथके मदतकार्यात उतरली आहेत. अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.