पालघर : वसई- विरार महापालिकेच्या शंभर एमएलडी क्षमतेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनी वरील गळती रोखण्यासाठी सुरू असलेले दुरुस्तीचे काम लांबल्याने पालघरच्या पूर्व भागात पाणीबाणी निर्माण झाली आहे. आठवडा भरापासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने गृहिनींच्या डोक्यावर हंडे चढले असून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.मुंबई- अहमदाबाद महामार्गालगतच्या खाजण भागात झालेला माती भराव आणि खाऱ्या पाण्यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण होत असल्यामुळे दुरुस्तीचे काम लांबले आहे.
पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला वसई तालुक्यातील कोपर गावाच्या हद्दीत रविवारी गळती सुरु झाली होती. आठवडा भरापूर्वी वसई तालुक्यातील कोपर गावाच्या हद्दीत वसई विरार महापालिकेच्या सूर्या पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनीला गळती सुरु झाली होती. गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचे काम सुरु करण्यासाठी पालघर तालुक्यातील येथील मासवण स्थित सूर्या नदीवरील पंपिंग स्टेशन वरील विद्युत पंप बंद करण्यात आले.आठवडा भरापासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने गृहिणी तसेच ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.
सूर्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनी मधून उपलब्ध होत असलेल्या शुद्ध पाण्यामुळे पालघर पूर्व भागातील ग्रामीण भागात पाण्याच्या पारंपरिक स्रोतांवर दुर्लक्ष झाले आहे. जलवाहिनी मधून मिळणारे पाणी बंद झाल्याने दैनंदिन वापरासाठी पाणी मिळवताना महिलांसह ग्रामस्थांची दमछाक होत आहे.पाण्यासाठी महिलांना हंडा डोक्यावर घेऊन सुस्थीतीत असलेल्या विहिरिंसह अन्य स्रोतांचा शोध सुरु झाला आहे. वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी कोपर गावाच्या हद्दीत मुंबई अहमदाबाद महामार्गालगत फुटल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले.महामार्गालग माती भराव झाल्याने जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी पोक्लेन मशीनच्या साहाय्याने तीस ते चाळीस फुटा पर्यंत खोदकाम करावे लागले.
गळती लागलेल्या ठिकाणी खाजण भाग असल्यामुळे जलवाहिनीवरील खाऱ्या पाण्याचा प्रभावामुळे लोखंडी जलवाहिनी गंजून पन्नास ते साठ मिटर अंतराची जलवाहिनी जीर्ण झाल्याचे आढळून आले आहे. दुरुस्तीच्या कामा अंतर्गत जीर्ण झालेल्या लोखंडी जलवाहिनीला लोखंडी आवरण बसवण्याचे काम पाणीपुरवठा विभागाकडुन हाती घेण्यात आले आहे.दुरुस्तीच्या ठिकाणी खाजणातील पाणी साचत असल्यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येत असल्यामुळे दुरुस्तीचे काम लांबले आहे. जीर्ण झालेल्या जलवाहिनीच्या दुरुतीच्या कामाला एक आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
आठवडाभर पाणीपुरवठा बंद असल्यामुळे लग्नसराई आणि धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर परिणाम झाला होता. धावपळ करण्याची वेळ आली होती. पालघर तालुक्यातील धुकटन, बहाडोली, दहिसर तर्फे मनोर, साखरे,नावझे,ढेकाळे आणि गांजे गावांमध्ये पाणीबाणी निर्माण झाली होती. वीस ते 25 वर्षांपूर्वी जमिनीखालून टाकलेल्या लोखंडी जलवाहिनीची क्षमता कमी झाल्याने जलवाहिनी गळती लागण्याचे प्रमाणात वाढले आहे. शहरासह पालघर तालुक्याच्या पूर्व भागातील पाणीपुरवठा प्रभावित होत असल्यामुळे जुने लोखंडी पाईप काढून उच्च क्षमतेचे लोखंडी पाईप टाकण्याची मागणी जोर धरत आहे.