पालघर: नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला कथित संरक्षण दिल्याचा आरोप करत मंत्री नितेश राणे यांनी एमआयएम पक्षावर थेट बंदी घालण्याची मागणी केली. पालघरमधील सातपाटी येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी एमआयएमची तुलना पीएफआय, आयएसआय आणि अल कायदासारख्या संघटनांशी करत “हा राजकीय पक्ष सामाजिक कामासाठी आहे की जिहाद पसरवण्यासाठी?” असा संतप्त सवाल उपस्थित केला.
निदा खान ही फक्त “मुखवटा” असून कॉर्पोरेट जिहादच्या माध्यमातून हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्याचे कट-कारस्थान रचले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. वंदे मातरम् हे आमचे राष्ट्रगीत आणि देशाचे गीत आहे त्याला हे म्हणायचे असेल त्याने पाकिस्तानमध्ये निघून जावे, असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला.