पालघर : पालघर तालुक्यातील गिराळे गावाच्या हद्दीत मुंबई–बडोदा एकप्रेस वे च्या मुंबई वाहिनी लगत 25 ते 30 एकर क्षेत्रात माती मुरूमाच्या भरावामुळे गिराळे आणि नगावे गावातील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे.एक्सप्रेस वे लगतच्या रेस्ट एरिया निर्मितीसाठी केलेल्या भरावामुळे पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी असलेले नैसर्गिक मार्ग बंद झाल्याने पेरणी केलेल्या शेतात आठ ते दहा फुटा पर्यंत पाणी साचत असल्यामुळे २५ ते ३० शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेल्याने पेरणी वाया गेली आहे.साचलेल्या पाण्याच्या नीचऱ्यासाठी उपाययोजना तसेच पेरणी वाया गेलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे.
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पावसाने हुलकवणी दिली होती. परंतु जून महिन्याच्या अखेरीस पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला होता.पाऊस सुरु झाल्यानंतर लगेचच गिराळे आणि नगावे गावातील शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रातून संकरीत बियाणे खरेदी करून शेतात पेरणी केली होती.मात्र मुंबई बडोदा एक्सप्रेस वे च्या पूर्व भागात रेस्ट एरिया च्या निर्मितीसाठी राखीव असलेल्या २५ ते ३० एकर क्षेत्रात काही महिन्यांपूर्वी माती मुरुमाचा आठ ते दहा फूट उंचीचा भराव करण्यात आला होता.
भराव करताना पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने एक्सप्रेस वे च्या रेस्ट एरियाच्या पूर्व भागातील शेतांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली होती.अतिवृष्टी काळात शेतात आठ ते दहा फुटा पर्यंत पाणी साचल्याने पेरलेले बियाणे कुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पेरणी वाया गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एक्सप्रेस वे आणि रेस्ट एरियाच्या भराव करताना नैसर्गिक नाले माती भराव टाकून बंद करण्यात आल्याने गावाच्या पूर्व भागात असलेल्या डोंगर माथ्यावरील पावसाचे पाणी वैतरणा नदीकडे जाण्या ऐवजी शेतात थांबत असल्यामुळे असून भात शेतीचे मोठे नुकसान होत आहे.
गेल्या वर्षी पाणी साचले होते परंतु यंदा रेस्ट एरिया साठी केलेल्या भरावामुळे पाण्याखाली जाणाऱ्या क्षेत्रात वाढ झाली आहे.वारंवार तक्रारी करूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.पावसाच्या पाण्याच्या नीचऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करून शेतात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा तसेच शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मुंबई बडोदा एक्सप्रेस वे लगत २५ एकर क्षेत्रात यंदा रेस्ट एरियासाठी माती भराव केल्यामुळे रेस्ट एरिया लगतची सुमारे २५ ते ३० एकर भात शेती पाण्याखाली गेली आहे.शेतात पाणी भरून राहिल्याने पेरणी वाया गेली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे.पावसाच्या पाण्याचा निचऱ्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी.. -विश्वनाथ पाटील, शेतकरी, गिराळे.