कासा ःमहाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग सध्या जीवघेणा ठरत असून, जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे या महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.
मागील वर्षी करोडो रुपयांचा खर्च करून घोडबंदर ते अच्छाड या महामार्गावर नवीन सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, केवळ एका वर्षाच्या आतच या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम उघड झाले असून, संपूर्ण महामार्ग खड्डेमय बनल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेवर गदा आली आहे.
महामार्गावरील आंबोली नदीवरील पुल, धानिवरी नदीवरील पुल, महालक्ष्मी उड्डाण पुल, घोळ सूर्या नदीवरील पुल तसेच घोळ टोल नाक्याजवळील पुल या ठिकाणी गेल्या महिन्याभरापासून दोन फुटांपेक्षा मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे असंख्य वाहनांचे अपघात झाले असून, शेकडो नागरिक मृत्युमुखी पडले तर अनेक गंभीर जखमी झाल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे हे खड्डे पाण्याने भरले जात असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही, आणि परिणामी अपघातांची संख्या अधिक वाढली आहे. या अपघातांचा सर्वाधिक फटका स्थानिक रिक्शाचालक, मोटारसायकलस्वार तसेच शाळकरी विद्यार्थी व सामान्य नागरिकांना बसत आहे.
विशेष म्हणजे, धानिवरी पुलावरील खड्ड्यांमधून लोखंडी सळई बाहेर निघाल्यामुळे वाहनांचे टायर फाटणे, दुचाकी घसरून पडणे अशा घटना सतत घडत आहेत. महालक्ष्मी पुल व सूर्या नदीवरील खड्डे तर रोजच्या रोज अपघाताला आमंत्रण देत आहेत.मात्र, वारंवार अपघात होऊन जीवितहानी होत असतानाही महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदार कंपनी निष्क्रिय बसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. गेल्या महिन्याभरापासून महामार्गावर दुरुस्तीचे कोणतेही काम झाले नसल्याने वाहनचालकांत प्रचंड रोष आहे.
स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेऊन महामार्ग सुरक्षित करण्याची मागणी प्रशासनाकडे केली असून, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.