पालघर: पावसाळा तोंडावर असताना महावितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी आजपासून कामबंद आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. मागील तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने संतप्त झालेल्या पालघर जिल्ह्यातील साडेतीनशेहून अधिक कंत्राटी कामगारांनी पालघर येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
सलग तीन महिने वेतन रखडल्यामुळे कंत्राटी कामगारांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले असून उपासमारीची वेळ आली आहे. एकीकडे पावसाळ्यापूर्वी वीज वाहिन्यांची दुरुस्ती, झाडांच्या फांद्या छाटणे, नवीन खांब उभारणे तसेच वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत.
ही कामे करणाऱ्या कंत्राटी कामगारांना घामाचा मोबदला मिळत नसल्याने कंत्राटी कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महावितरण कंपनीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून कामगारांनी विभागाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रखडलेले वेतन तातडीने अदा करावे, कंत्राटी कामगारांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि कामगारांना न्याय द्यावा, आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.
दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज यंत्रणेच्या देखभाल आणि दुरुस्तीची महत्त्वाची कामे सुरू असताना कामगारांच्या आंदोलनामुळे वीज व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे महावितरण कंपनीसमोर आव्हान उभे राहिले असून कामगारांच्या मागण्यांबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.