हनिफ शेख
पालघर: सध्या राज्यात नवीन अभ्यासक्रमांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे . त्यानुसार राज्यातील दुसरी, तिसरी, चौथी या वर्गांचा अभ्यासक्रम बदलणार असल्याने राज्यातील या इयत्ता शिकवणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्याकडून निश्चित कालावधी ठरविण्यात आला आहे.
या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहे.शैक्षणिक वर्ष 15 जून 2026 पासून सुरू होणार असल्यामुळे नवीन अभ्यासक्रम लागू होणाऱ्या वर्गाच्या शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होणे आवश्यक आहे. यानुसार इयत्ता दुसरी तिसरी आणि चौथीच्या सर्व शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी राज्यस्तर जिल्हास्तर व तालुकासर प्रशिक्षण नियोजन करण्यात येणार आहे.
यामध्ये शिक्षक प्रशिक्षण मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शिक्षकांसाठी स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येईल तर अन्य माध्यमांना मराठी माध्यमांसोबत सामावून घेतले जाईल. मात्र उर्दू माध्यमासाठी राज्यस्तर व जिल्हा स्तर असे दोनच स्तर असतील तर मराठी सोबत अन्य माध्यमांसाठी प्रशिक्षण हे राज्यस्तर जिल्हास्तर व तालुकास्तर अशा क्रमाने आयोजित करण्यात येणार आहे.
प्रत्येक वर्गात अपेक्षित विषयांच्या निर्धारित तासिका पूर्ण होण्यासाठी दुसरीसाठी तीन दिवसाचा आणि तिसरी व चौथीसाठी चार दिवसांचा प्रशिक्षण कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे.यानुसार राज्य सर प्रशिक्षण हे 4 ते 7 मे जिल्हास्तर 11 ते 14 मे तालुका प्रशिक्षण 18 ते 30 मे याशिवाय उर्दू साठीचे राज्यस्तर प्रशिक्षण 4 ते 7 मे आणि जिल्हास्तर प्रशिक्षण हे 11 ते 30 मे या कालावधीत होणार आहे.
यानुसार प्रशिक्षण घटक संच व वाचन साहित्य पोहोचविण्यात देखील येणार आहे.जिल्हा सर्व तालुकास्तर प्रशिक्षण आयोजनाची जबाबदारी संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट यांची असणार आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांच्या एकूण संख्येनुसार 60 प्रशिक्षणार्थ्यांचा एक वर्ग याप्रमाणे आवश्यक बॅचेस तयार करण्यात आलेले असल्याचे देखील सांगण्यात येत असून त्यानुसार प्रशिक्षण स्थळ व तज्ञांची निवड आणि पूर्व तयारी करण्याच्या सूचना करण्यात आलेले आहेत.
मुळात नवीन अभ्यासक्रम प्रभावीपणे शिकवण्यासाठी शिक्षकांची योग्य तयारी असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजणे सोपे जाते आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारते. सर्वप्रथम, शिक्षकांनी नवीन अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमातील उद्दिष्टे, विषयांची मांडणी आणि शिकवण्याच्या पद्धती यांची स्पष्ट माहिती असावी. यामुळे शिक्षकांना अध्यापन अधिक नियोजनबद्ध पद्धतीने करता येते. यामुळे हे प्रशिक्षण महत्त्वाचे मानले जाते.
एकूणच अभ्यासक्रम बदलत असला तरी यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान/परिसर अभ्यास हे विषय असणार आहेत. मराठी इंग्रजी परिसर अभ्यास यावर या अभ्यासक्रम बदलाचा परिणाम होणार आहे. कारण की यामधील धडे बदलण्याची चिन्हे आहेत.
मात्र या अभ्यासक्रमाबरबरोच अध्यापन पद्धती आत्मसात करणे देखील आवश्यक असून प्रकल्पाधारित शिक्षण, कृती आधारित शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा वापर या गोष्टींचा समावेश डिजिटल साधनांचा वापर करण्याची तयारी असावी.
संगणक, प्रेझेंटेशन, ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स यांचा योग्य वापर केल्यास अध्यापन अधिक प्रभावी होते अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बदलणाऱ्या जगात शिक्षण प्रणालीतही बदल होणे गरजेचे आहे. त्यामुळे नवीन अभ्यासक्रम लागू केल्याने विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना मिळते. अभ्यासक्रम बदलाचा निर्णय स्वागतार्ह आहे अशी भावना आहे.
अधिकृत विषय सहाय्यकाना कधी घेणार ?
हे प्रशिक्षण प्रक्रिया राबविताना सुलभकांची संख्या निश्चित करून दिलेल्या संख्येच्या मर्यादेत जिल्हास्तर टी ओ टी साठी सुलभक यांची निवड करावयाची असते. यामध्ये उत्तम प्रशिक्षक कौशल्य असणारे अभ्यासक्रम निर्मितीमध्ये सहभागी सदस्य अनुभवी व्याख्याता पर्यवेक्षकीय अधिकारी शिक्षक अध्यापक विद्यालयातील अध्यापक आचार्य इत्यादी तज्ञांचा समावेश करावा अशा सूचना आहेत.
यामुळे राज्यस्तरावर प्रशिक्षण झाल्यानंतर जिल्हास्तर आणि त्यानंतर तालुका सरावर हे प्रशिक्षण बीटनिहाय देण्यात येणार असल्याची माहिती आहे. यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची मोठी जबाबदारी आहे. मात्र पालघरमधील विशेष सहाय्यक म्हणून अधिकृत निवड झालेल्या दोन शिक्षकांना अद्यापपर्यंत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पालघर म्हणजेच शिक्षण विभाग पालघर यांनी हजर करून केले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.