पालघर : हनिफ शेख
डोक्यावरचा हंडा कमरेवर यावा यासाठी गेल्या कित्येक दशकापासून पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात संघर्ष सुरू आहे.मात्र सरकारच्या महत्त्वकांक्षी असलेल्या जलजीवन योजनेच्या माध्यमातून थेट घरात नळ आल्याने लोकांमध्ये आनंद होता आणि या योजनेमुळे जवळपास 99% पाणीटंचाई संपेल अशी अपेक्षा होती. मात्र शासनाच्या उदात्त हेतूला शासनानेच निधी देण्यास दिरंगाई केल्याने या योजनेच्या यशस्वीतेबद्दल आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वेळेवर चालू कामांना आणि केलेल्या कामांना देखील पैसे न मिळाल्याने अनेक कामे आज घडीला रखडली आहेत.यामुळे कोट्यवधी रुपयांची
जलजीवन योजना राबवून देखील यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळ तीव्र होईल अशी स्थिती सध्या दिसून येत आहे. जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वगळून केवळ जिल्हा परिषदेकडून तब्बल 563 पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू होती. यातील 203 कामे आज घडीला पूर्ण झाले असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र या कामापोटी तब्बल 242 कोटी रुपये शासनाकडून न मिळाल्याने ठेकेदारांनी देखील मागे आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मात्र पुर्वीचाच निधी न आल्याने अनेक ठेकेदार हातात असलेली कामे करण्यास धजावत नसल्याने अनेक पाणीपुरवठा योजना आज घडीला रखडले आहेत.
पालघर जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून एकूण 563 पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या यामधील 203 योजनांची कामे पूर्ण आहेत. 210 कामे ही तर 80 ते 90 टक्के पूर्ण झाली आहेत याचबरोबर 50 ते 75 टक्के प्रगतीवर असलेल्या कामांची संख्या 106 आहे तर 40 कामेही 25 ते 50 टक्के पूर्ण झालेली दिसून येतात. तर चार काम आहे आज घडीला चालू केल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसते यामध्ये तब्बल 899 गावांपैकी 614 गावांकरिता ही नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे तर 399 गावांकरिता 26 प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून सुरू आहेत या सर्व गावांकरिता एकूण 780 घरगुती नळ जोडण्याची कामे जिल्हा परिषद अंतर्गत घेण्यात आलेली आहेत. सध्या निधी नसल्याचे कारण देत अनेक ठेकेदारांनी काम करण्यास दिरंगाई केल्याने मुदतबाह्य कामावर दंड आकारण्याची कारवाई देखील पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आलेली आहे. मात्र कुठे होती रुपयांची कामे असताना पन्नास टक्के देखील निधी अद्याप पर्यंत अनेक कामांना दिलेला नसल्याने ठेकेदारांची मोठ्या प्रमाणावर झाली आहे त्यातूनच मग अनेक कामे सध्या रखडल्याने या अतिशय चांगल्या योजनेचा बोजवारा यातून उडाल्याचे एकूणच दिसून येते.
पालघर जिल्ह्यासाठी या आधी देखील निधी आला तो अतिशय तटपुंजा होता कारण की मागील जानेवारीमध्ये दोन कोटी चौदा लाख आणि त्यानंतर फक्त 36 लाख एवढा निधी प्राप्त झाला. तसेच दिवाळीनंतर देखील फक्त अडीच कोटींचा निधी प्राप्त झाला यामुळे हा निधी नेमका वाटप कसा करायचा आणि कोणाला करायचा असा प्रश्न येथील अधिकारी वर्गाला देखील पडला होता. कारण बिले काढण्यासाठी जी प्रक्रिया पार पाडावी लागते त्यासाठी अनेकदा खूप वेळ लागतो आणि एवढे करूनही जर 30 ते 40 लाखांच्या कामासाठी एक लाख आणि दोन लाख असा निधी मिळणार असेल तर ती प्रक्रिया न केलेली बरी असे समजूनही काही ठेकेदारांनी ही बिले काढण्याचा प्रयत्न केला नाही.
मात्र आता मार्च महिना असल्याने मोठ्या प्रमाणावर निधी येईल आणि आमची बिले मिळतील अशी आशा जिल्ह्यातील ठेकेदारांना वाटत आहे.
पालघर जिल्ह्याला मागील दोन वेळा कमी निधी आला तसेच पालघर जिल्हा सागरी डोंगरी नागरी असा विखुरलेला असल्याने जव्हार मोखाडा मधील टंचाई सदृश्य परिस्थिती पाहता या मार्चमध्ये निधी वाटपात पालघर जिल्ह्याला ग्रामीण जिल्हा म्हणून अधिकचा निधी मिळावा अशी देखील आमची मागणी आहे.अजय यादव, अध्यक्ष,जिल्हा पाणीपुरवठा ठेकेदार संघटना.