पोलादपूर: धावपळीच्या आणि वेगवान जीवनशैलीत सध्या तरुणाईचा कल सकस आहाराऐवजी चायनीज, बर्गर, वडापाव आणि चाट अशा फास्टफूडकडे मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अगदी लग्नसराई आणि महाप्रसादासारख्या कार्यक्रमांतही आता या पदार्थांचा वापर वाढला असून, अन्न प्रशासनाकडून यावर कडक नियमावली लागू केली जात आहे. झटपट तयार होणारे आणि चविष्ट असणारे हे पदार्थ जरी भूक भागवत असले, तरी ते आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत आहेत.
या पदार्थांमध्ये कर्बोदके, घातक फॅट्स, अतिरिक्त साखर आणि सोडिअमचे (मीठ) प्रमाण जास्त असते, तर पोषक तत्त्वांचा पूर्णपणे अभाव असतो. त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढून वजन वाढणे आणि अपचनासारख्या समस्या निर्माण होतात.
वैद्यकीय अधिकाऱ्यांचा इशारासतत फास्टफूड खाण्यामुळे पचनशक्ती कमकुवत होते. शारीरिकच नव्हे, तर मानसिक आरोग्यावरही याचा थेट परिणाम होतो. मेंदूची कार्यक्षमता आहारावर अवलंबून असल्याने फास्टफूडमुळे ताणतणाव आणि नैराश्य वाढण्याचा धोका असतो, असा इशारा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.