खानिवडे : दिवाळी सणानिमित्ताने वसई तालुक्यातील बाजारपेठेत अनेक प्रकारच्या पणत्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्या आहेत. मात्र यंदा नागरिकांनी खरेदी करताना स्वदेशी पणत्यांनाच पसंती दिली आहे. यामुळे गणेशोत्सव सरताच पणती निर्मितीसाठी काम करणाऱ्या कारागिरांना व आता विविध नाक्यांवर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना रोजगार प्राप्त झाला आहे. आकारमान व डिझाइन प्रमाणे 30 ते 60 रुपये डझन असा सर्वसाधारण पणत्यांचा दर आहे. अनेक विक्रेते गावगल्लीत फेरी करून सुद्धा पणत्या विकताना दिसून येत आहेत.
संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी होणारी दिवाळी आजही परंपरेने विविध प्रकारच्या व आकाराच्या पणत्यांनी नागरिकांकडून प्रकाशमय करण्यात येते. त्यामुळे दिवाळीच्या सणात पणत्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतातील दिवाळी हा सण प्रकाशाचा व तेजाचा सण म्हणून जगद्विख्यात आहे. प्रथा-परंपरेनुसार वसूबारस ते भाऊबीजेपर्यंत दिवाळी सण साजरा होत असतो. या दरम्यान प्रत्येक घरात पणत्या लावून आवर्जून रोषणाई केली जाते.
सध्याच्या युगात वीजेवर चालणारी इतकी साधने असतानाही दिवाळीत आपण पणत्या आवर्जून लावत असतो. कारण विजेच्या दिव्यात आपल्या तेजाने दुसऱ्या दिव्याला प्रकाशित करण्याची शक्ती नाही. जी सामान्य पणतीच्या ज्योतीत आहे. एका पणतीची ज्योत हव्या तितक्या इतर पणत्यांना प्रकाशमान करु शकते. ज्योतीने ज्योत पेटवण्याचा उत्सव म्हणजे दीपावली होय.
स्वदेशी पणत्यांना मोठी पसंती
पणती स्वतः तेजाने प्रकाशित होतेच, पण ती इतरांनाही त्याच तेजाने प्रकाशित करते. दीपावली सणात पणत्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त असल्यामुळे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा बुलंद केल्याने नागरिकांनी यंदा चायनीज पणत्यांना दूर सारत स्वदेशी पणत्यांना मोठी पसंती दिली आहे.