वाडा : वाडा तालुक्यात महामार्ग, अंतर्गत रस्ते किंवा गावागावातील मार्ग एकही रस्ता असा नाही की ज्यावरून वाहनचालक सुकर प्रवास करू शकतात. भिवंडी - वाडा - मनोर महामार्गाची सुधारणा होत नसल्याने पर्यायी मार्ग मरणपंथाला गेले असून याचा फटका मात्र तालुक्यातील दळणवळणाला बसला आहे. गोर्हेफाटा ते कुडूस या मार्गावरून अशाच प्रकारे अवजड वाहतूक होत असल्याने नुकताच स्थानिक सरपंचांनी पत्रव्यवहार केला होता मात्र त्याची दखल न घेतल्याने खानिवली गावाजवळ मोरीला भगदाड पडून वाहतुकीवर संकट कोसळले आहे.
वाडा - भिवंडी महामार्ग जीवघेण्या खड्ड्यांनी भरलेला असून पर्याय म्हणून वाहनचालक गोर्हेफाटा ते कुडूस आणि शिरीषपाडा मार्गे नाशिक महामार्ग असा प्रवास करतात. अती अवजड वाहनांनी याच मार्गाने शिरकाव केल्याने पर्यायी मार्ग संपुष्टात आले असून सावरोली गावाजवळील पुलाला याच प्रकाराने तडा गेल्याने तो कमकुवत बनला आहे. गोर्हेफाटा ते कुडूस या मार्गावर अशाच अवजड वाहनांमुळे रस्ता संपुष्टात आला असून खानिवली परिसरात रस्त्याची अवस्था दयनीय होऊ लागली आहे.
गारगाव गावाजवळ अशाच एका मोरीला भलेमोठे भगदाड पडले असून अनेक गावांचा संपर्क यामुळे तुटण्याची भीती निर्माण झाली आहे. धक्कादायक म्हणजे सावरोली पुलाला तडा गेल्याने अवजड वाहनांसाठी हा मार्ग बंद करण्यात आला असूनही रात्रीच्या वेळी बेशिस्त वाहनचालक अवजड वाहतूक करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत कठोर कारवाई करावी अशी मागणी असून लोखंडी कमान उभारावी अशी मागणी आहे.