पालघर

Dahi Handi Govinda Insurance | दहीहंडी उत्सव; गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण; महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक

दहीहंडी उत्सव; गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण; महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पुढारी वृत्तसेवा

वसई : दहीहंडी उत्सवात भाग घेणाऱ्या गोविंदांना महानगरपालिकेतर्फे विमा संरक्षण देणे, तसेच नियमांचे पालन करून दहीहंडी उत्सव साजरा करणे, तसेच दहीहंडी उत्सवासंदर्भातील विविध विषयांबाबत चर्चा करणेसाठी वसई विरार शहर महानगरपालिका, क्रीडा विभागामार्फत माननीय महापौर अजीव पाटील यांचे अध्यक्षतेखाली मंगळवारी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात गोविंदा पथक, दहिहंडी उत्सव आयोजक, स्थानिक पोलिस विभाग, वाहतुक विभाग, महावितरण विभाग, अग्निशमन विभाग व इतर अन्य विभागासमवेत संयुक्त बैठक संपन्न झाली.

उप-आयुक्त अजित मुठे यांनी बैठकीच्या सुरुवातीस मागील वर्षी महानगरपालिकेमार्फत गोविंदा पथकांना देण्यात आलेल्या विमा संरक्षण बाबत माहिती दिली. मागील वर्षी विमा संरक्षण मिळणे कामी महानगरपालिकेत नोंदणी केलेल्या सुमारे २९ गोविंदा पथकांना महानगरपालिकेने इन्शुरन्स कंपनी मार्फत १० लाखांपर्यंत विमा संरक्षण काढून दिलेले होते. ९९ गोविंदा पथकांमध्ये एकूण ६६५२ गोविंदांचा समावेश होता. यावर्षीही याचप्रमाणे विमा संरक्षण देण्यात येणार असून सर्व दहीहंडी आयोजकांनी मा. न्यायालयाने व शासनाने दिलेल्या नियमांनुसार तसेच सर्व संबधित विभागाच्या परवानगी घेवूनच उत्सवाचे आयोजन करावे. आयोजकांना उत्सवाचे आयोजन करणे कामी एकाच ठिकाणी विविध शासकीय विभागांच्या परवानग्या प्राप्त होणेकामी महानगरपालिकेमार्फत लवकरच 'एक खिडकी योजना' सुरु करण्यात येईल.

गोविदांना विनामुल्य विमा देण्यात येत असून विमा योजनेचा तात्काळ व विनाअडचण लाभ देणेकामी गोविंदा पथकांनी विमा संबंधी दिलेला फॉर्म योग्यरित्या भरावा व आवश्यक ती सर्व कागदपत्र जोडून लवकरात लवकर प्रभाग समिती कार्यालय अथवा मुख्यालय येथे जमा करावा. जरी महानगरपालिकेमार्फत विमा संरक्षण देण्यात येत असले तरी आयोजकांनी उत्सवाच्या ठिकाणी सर्व सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात. असे उप-आयुक्त अजित मुठे यांनी सांगितले. या बैठकीस उपस्थित सहाय्यक पोलीस आयुक्त गीते यांनी उपस्थितांशी बोलताना सांगितले कि, प्रत्येक उत्सव सुरक्षितरित्या साजरे केले जावेत यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून नागरिकांचेही तेवढेच सहकार्य अपेक्षित आहे.

दहीहंडी उत्सव साजरा करताना आयोजकांनी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना कराव्यात, रस्त्यावर गर्दी होवून वाहतुकीस तसेच नागरिकांना येण्या-जाण्यास अडथळा निर्माण होवू नये यासाठी उपाययोजना करावी, मंडपाच्या जागा सुनिश्चित करून त्या रस्त्यावर येणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. बैठकीस उपस्थित महाराष्ट्र राज्य दहीहंडी असोसिएशनच्या सचिव गीता झगडे यांनी उपस्थितांना दहीहंडी उत्सवासंदर्भात विविध प्रकारची माहिती दिली. दहीहंडी उत्सवात गोविंदांना विनामुल्य विमा संरक्षण देणारी वसई विरार शहर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका असल्याचा उल्लेख करीत महानगरपालिकेच्या या प्रोत्साहनामुळे दहीहंडी पथके उत्साहाने या साहसी खेळात भाग घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

महावितरण विभागाच्या वतीने ही आयोजकांना सूचना देण्यात आली कि, दहीहंडी ची उभारणी विद्युत वाहिन्यांच्या जवळ नसावी ती सुरक्षित अंतरावर उभारावीत तसेच उत्सवावेळी लागणारे विजेचे अधिकृत कनेक्शन घ्यावीत जेणेकरून कोणताही अपघात होणार नाही. यावेळी महापौर अजीव पाटील यांनी सांगितले कि, महानगरपालिकेमार्फत गोविंदा पथकांना विनामुल्य विमा देण्यात येत असून पथकांनी संबंधित विभागाशी संपर्क करून लवकरात लवकर आपली नोंदणी करून घ्यावी. सर्व आयोजकांनी न्यायालय व शासनाने दिलेल्या नियमानुसारच उत्सव साजरा करावा, गोविंदाना कोणत्याही प्रकारची दुखापत होवू नये यासाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना आयोजकांनी कराव्यात, १४ वर्षाखालील मुला-मुलींचा समावेश गोविंदा पथकात करू नये, आदी सुचना करण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT