सफाळे : पश्चिम रेल्वे मार्गावरील डहाणू विभागात डहाणू लोकल सुरू होऊन तब्बल 13 वर्षे पूर्ण झाली असली तरी या कालावधीत वैतरणा ते डहाणू दरम्यान प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या गर्दीमुळे सध्या धावणाऱ्या लोकलच्या फेऱ्या अपुऱ्या पडत असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने सफाळे व वैतरणा येथील प्रवाशांना गाडीत चढणेही कठीण होत आहे. त्यामुळे डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे. सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींमार्फत रेल्वेमंत्री, रेल्वे बोर्ड तसेच रेल्वे अधिकाऱ्यांकडे निवेदने देऊन पाठपुरावा केला जात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात लोकलच्या फेऱ्या वाढविण्याबाबत कोणतीही ठोस हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे प्रवाशांच्या अपेक्षा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.
दरम्यान, या प्रश्नावर विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या समस्या जाणून घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेणे, निवेदने देणे तसेच संसद व विधानसभेत हा मुद्दा प्रभावीपणे मांडणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
1 एप्रिलपासून उपनगरीय लोकलचे नवीन वेळापत्रक लागू होणार असल्याने या वेळापत्रकात डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविणे तसेच 15 डब्यांची लोकल सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. आता या मागणीबाबत सत्ताधारी व विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कितपत यशस्वी ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.