वाडा : वाहतुकीसाठी अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोऱ्हेफाटा ते खानिवली रस्त्यावर असणाऱ्या वैतरणा नदीवरील पुलाची अवस्था दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे. पुलाच्या दोन स्लॅब मधील भेग दुर्लक्षामुळे व वाहनांच्या धक्क्याने वाढत असून यात भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र सुस्त बसले असून अपघाताची वाट बघत आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय डोंगरे यांना संपर्क केला असता त्यांनी नेहमीप्रमाणे कोणताही प्रतिसाद दिला नाही.
मनोर - भिवंडी महामार्गाची अवस्था भीषण असल्याने पर्यायी मार्ग म्हणून खानिवली मार्गे गोऱ्हेफाटा मार्ग वाहनचालकांसाठी दिलासादायक ठरणार असल्याची अपेक्षा होती. निधी खर्च करूनही निकृष्ट कामामुळे अनेक टप्प्यात नव्याने केलेल्या डांबरीकरणाची अवस्था भीषण आहे. आपटी पासून मुंगुस्ते व वावेघर पट्ट्यात तर रस्ता शिल्लक राहिलेला नसून वाहने पावसाळ्यात अक्षरशः गुडघाभर खड्ड्यातून प्रवास करतात अशी अवस्था आहे. वैतरणा नदीच्या पुलाची अवस्था दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली असून भीषण अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे.
पुलाच्या विविध टप्प्यात थोडे अंतर ठेवले जात असून त्यावर लोखंडी आवरण असते. वैतरणा पुलावरील टप्प्यातील लोखंडी आवरण गायब झाली असून दोन स्लॅब मधील अंतर वाढत आहे. वाहनांच्या धक्क्याने आता हे अंतर धोकादायक बनले असून लहान वाहने तर यात अडकून चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
अनेक दिवसांपासून ही अवस्था असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे स्थानिक सांगतात. अती अवजड वाहनांची येजा असे असतानाही थांबायला तयार नसून अती अवजड वाहनांमुळे पुलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.