खानिवडे : देशात धर्मांतराची पाळेमुळे ही मागील काळात खोलवर रुजली असताना पालघर जिल्हाही धर्मांतरापासून सुटलेला नाही. मात्र असे असताना १८ एप्रिल रोजी वसईत ५०६ धर्मांतरित कुटूंबांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश करून घरवापसी केल्याने अखिल हिंदू समाजातून त्यांचे मोठया जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. ही घर वापसी स्वामी नरेंद्रचार्य संस्थानच्या मुंबई उप पीठातील शिरसाड येथे झाली.
आतापर्यंत या संस्थानामार्फत एक लक्ष एक्कावन्न हजर दोनशे अठयाहत्तर धर्मांतरीतांना पुनश्च हिंदू धर्मात धार्मिक विधींतून घरवापसी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील पालघर हा देखील एक जिल्हा असून येथील आठच्या आठ तालुक्यात आदिवासींचे प्राबल्य आहे. मात्र दुर्गम खेड्यापाड्यात, वस्ती वाड्यात, निर्मनुष्य रानावनात रहिवास करणाऱ्या या समाजात अद्यापही शिक्षणाचा, पायाभूत सोयी सुविधांचा व सुधारित जीवन शैलीचा अभाव आहे.
यामुळे त्यांच्या भोळेपणाचा व अज्ञानाचा फायदा घेऊन वेगवेगळे अमिष दाखवून त्यांचे सुनियोजित धर्मांतर केले जात आहे. त्यामुळे धर्मांतरात आदिवासींची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये पुन्हा आपल्या हिंदू धर्मात घरवापसी करण्यात जगद्गुरु नरेंद्रचार्य संस्थानाने घेतलेल्या पुढाकारात आमिष दाखवून वा फसवून अन्य धर्मात गेलेल्या ५०६ कुटुंबांना विधिवत पुन्हा सनातन हिंदू धर्मात घेण्यात आले. शुक्रवारी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली शिरसाड येथे हा विधिवत सोहळा झाला.
जगद्गुरूश्री नरेंद्राचार्य महाराज यांच्यामुळे आजपर्यंत १,५१, २७८ कुटुंबांनी हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. आपल्या हिंदू धर्मबांधवाना एका सुनियोजित षडयंत्राद्वारे विविध आमीषे दाखवून भुलथापा देऊन, त्यांच्या अज्ञानाचा, गरिबीचा गैरफायदा घेऊन, सनातन हिंदुधर्माबाबत अपप्रचार करून व अनेकदा धमकावून त्यांचे धर्मांतरण करण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे आजवर सनातन हिंदु धर्माची अपरिमित हानी झालेली आहे. पण अशा धर्मांतरित हिंदूंना उपरती होऊन पुन्हा हिंदुधर्मात येण्याची इच्छा असते. अशा हिंदू धर्मात घरवापसी करणाऱ्या कुटुंबांना पुन्हा विधिवत धर्मप्रवेश देण्याचे महाअभियान जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज, यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले जात आहे. असाच एक सोहळा शिरसाड (वसई) येथे झाला. यावेळी ५०६ कुटुंबांनी स्वधर्मात घर वापसी केली आहे.
या कार्यक्रमासाठी पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक रमेश ओझे उपस्थित होते. या सोहळ्यात पालघर, नाशिक तसेच गुजरातमधील धर्मांतरीत कुटुंबांना विधिवत हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आला. तीन तास हा विधी सुरू होता. त्यात गोमाता पूजन, होम हवन असे विधी झाले. या सर्व बांधवांना शपथ देण्यात आली. जगद्गुरुश्रींनी ही शपथ दिली. त्यानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मिशनरी वेगवेगळ्या प्रकारची अमीषे दाखवून हिंदू धर्मीय लोकांचा बाप्तिस्मा करतात. त्यांचे धर्मातर करून घेत आहेत. त्यातील बरीचशी मंडळी आदिवासी विभागातील आहेत. त्याच्या बोलीभाषेत तेल पाणी म्हणजे बाप्तिस्मा करून त्यांचे धर्मपरिवर्तन करतात. त्यांचे मुळचे नाव बदलत नाहीत. तसेच त्यांची जात आणि धर्म आदिवासी सोयीसुविधा मिळण्यासाठी न बदलता त्यांचे ख्रिश्चनीकरण करण्याचे काम सुरू आहे. या गोष्टीला आळा बसावा, तसेच ज्या लोकांना हिंदू धर्मातील उपासना पद्धती बदलल्यामुळे अपराधी वाटत होते ते आम्हाला येऊन भेटले. म्हणून आम्ही आता त्यांना पूर्वीची उपासनापध्दती सूरु करून दिली आहे. आज ५०६ कुटुंबांनी घरवापसी केलेली आहे. आजवर १,५१, २७८ लोकांना आम्ही पुन्हा हिंदू धर्मात आणले आहे.