धुळे, पुढारी वृत्तसेवा : एस.टी.कर्मचार्यांना वेळेवर वेतन मिळावे तसेच महागाई भत्ता, ग्रॅच्यूईटी देण्यासाठी कोणती उपाय योजना केली? याबाबत तारांकीत प्रश्न आमदार कुणाल पाटील यांनी उपस्थित केला. त्यामुळे पुन्हा एकदा एस.टी.कर्मचार्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आमदार पाटील यांनी केल्याने कर्मचार्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरु आहे. यावेळी तारांकीत प्रश्नात आमदार पाटील यांनी म्हटले आहे की, राज्यातील एस.टी.कर्मचार्यांना वेतनाची निर्धारित तारीख उलटूनही वेतन होत नाही. प्रत्येक महिन्याच्या 4 ते 10 तारखेदरम्यान नियमित वेतन होणे आवश्यक असते. मात्र निर्धारीत तारीख उलटूनही वेतन होत नसल्याने कर्मचार्यांची आर्थिक घडी विस्कटून त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येते. परिणामी कर्मचारी आर्थिक संकटात सापडला आहे. म्हणून एस.टी.कर्मचार्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या 4 ते 10 तारखेदरम्यान करण्यात यावे.
दरम्यान, एस.टी.कर्मचार्यांचे पीएफ, ग्रॅच्यूईटी कर्मचार्यांच्या वेतनातून कपात करुनही ते ट्रस्टकडे भरण्यात आले नाही. तसेच कर्मचार्यांना मिळणारा 34 टक्के महागाई भत्ताही अद्याप कर्मचार्यांना मिळाला नाही. त्यामुळे या प्रकरणी शासनाने ताबडतोब चौकशी करुन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्यांची सर्व थकीत देयके वेतन विहीत वेळेत अदा करण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी विधानसभेत तारांकीत प्रश्नातून केली आहे.
हेही वाचा