पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
'मेडिकलमधून गोळी घेऊन येतो' असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या मखमलाबाद रोडवरील अविनाश बापूराव पवार (३२) तरुणाचा मृतदेह पाच दिवसांनंतर सायखेडा येथील गोदावरी नदीच्या पुलाखाली आढळून आला आहे. त्यांनी रामवाडी पुलावरून गोदापात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मानसिक नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, या घटनेमुळे मखमलाबाद रोड परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रांतीनगर (वृंदावन कॉलनी, मखमलाबाद रोड) येथील रहिवासी अविनाश पवार हे खासगी नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक नैराश्यात होते. २५ जुलै रोजी सकाळी १० च्या सुमारास त्यांनी कुटुंबाला "माझे पोट दुखत आहे,
मी मेडिकलमधून गोळी घेऊन येतो," असे सांगितले आणि ते घरातून बाहेर पडले. अविनाश घरातून बाहेर पडून बराच वेळ उलटून गेल्यानंतरही ते परतले नाहीत. त्यामुळे त्यांचे भाऊ जितेंद्र पवार व अन्य कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा फोन बंद येत होता.
नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडे सर्वत्र शोध घेऊनही अविनाश यांचा काहीही पत्ता लागला नाही. यादरम्यान, त्यांनी रामवाडी पुलावरून गोदावरीच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात उडी घेतल्याची माहिती समोर आली.
गेल्या काही दिवसांपासून नदीला पूर आलेला असल्याने शोधकार्यात मोठे अडथळे येत होते. नदीपात्रात वाहून गेलेल्या अविनाश यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून प्रयत्न सुरू होते.
अखेर घटनेच्या पाच दिवसांनंतर, गुरुवारी (दि. ३०) सायखेडा येथील गोदावरी नदीच्या पुलाखाली एक मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून ओळख पटवली असता तो अविनाश पवार यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. अविनाश यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि परिवार असा परिवार आहे.