नाशिक : नील कुलकर्णी
दरवर्षी ३ जूनला जागतिक सायकल दिन साजरा होतो. सायकलला एक साधे, परवडणारे, विश्वासार्ह, स्वच्छ आणि पर्यावरणास अनुकूल शाश्वत वाहतुकीचे साधन म्हणून मान्यता देण्यासाठी २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने या दिनाची स्थापना केली.
१९९०च्या दशकापर्यंत नाशिकमध्ये कामगार, विद्यार्थी व महिलांचा सायकल प्रवास सामान्य होता. १९९५ नंतर दुचाकी वाहनांचे प्रचलन वाढले आणि सायकली मागे पडल्या. मात्र २०१२ मध्ये माजी पोलीस अधिकारी हरिश बैजल यांनी ‘नाशिक सायक्लिस्ट’ संघटना सुरू करून सायकल चळवळीस नवसंजीवनी दिली. ८-१० सदस्यांपासून सुरू झालेली ही चळवळ आज साडेचार हजारांवर पोहोचली असून, सायकलिंग उपक्रमांमुळे नाशिकला पुन्हा राष्ट्रीय पातळीवर ‘सायकल नगरी’ म्हणून ओळख मिळाली.
मात्र, शहरात अद्याप सायकलपटूंकरिता सुसज्ज व स्वतंत्र सायकल ट्रॅक उपलब्ध नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत उभारलेला अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका सायकल ट्रॅक दुभाजक तुटल्यामुळे आता पार्किंगसाठी वापरला जातो. त्र्यंबक रोडवरील ट्रॅकची घोषणाही हवेत विरली. आरोग्य व पर्यावरणपूरक सायकलिंगसाठी आतातरी स्वतंत्र सायकल ट्रॅक उभारावा, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, नोकरदार वर्गात आठवड्यातून एक दिवस ‘सायकल डे’ साजरा करण्याची चळवळही उभी राहत आहे.
शहरात एकही सायकल ट्रॅक नाही. त्र्यंबकरोडवर तो प्रशस्त रुपात गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित आहे. मात्र अद्यापही तो होऊ शकला नाही. एबीबी सर्कल जवळील पदपथालाच सायकलट्रॅक म्हणून नाव दिले, त्यावरुन सायकल चालवणे मुश्किल आहे. परदेशात जसे स्वतंत्र सायकल ट्रॅक आहेत तसे नाशिकमध्ये व्हावेत.डॉ. मनिषा रौंदळ, उपाध्यक्ष, नाशिक सायक्लिस्ट.
सायकलीपासून दूर गेलेला मध्यमवर्ग, कोविडनंतर पुन्हा सायकलकडे वळताना दिसतो आहे. नाशिकमध्ये २०२२ साली सायकल खरेदीसाठी इतकी मागणी वाढली की काही मॉडेल्सची टंचाई निर्माण झाली आणि ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागली. आजघडीला, श्रमिक वर्गापासून ते अतिश्रीमंतांपर्यंत अनेकजण आरोग्याच्या दृष्टीने सायकलिंगकडे वळले आहेत. विशेष म्हणजे, हेल्मेट, शूज, आणि विशेष टी-शर्ट घालून महागड्या सायकली चालवताना नागरिक शहरात पाहायला मिळतात.
दररोज सायकल चालवल्याने चरबी लवकर कमी होते. शरीर तंदुरुस्त राहते.
सायकल चालवल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
ठराविक वयानंतर गुडघ्यांचा त्रास होऊ नये म्हणून सायकलिंग करावी.
सायकल चालवल्याने मेंदू अधिक सक्रिय राहण्यासह त्याची शक्ती वाढते. मेंदू 15 ते 20 टक्के अधिक सक्रिय होते.
बचतीच्या दृष्टिकोनातून हे खूप चांगले आणि स्वस्त साधन.