नाशिक : पुढारी वृत्तसेवा
घरगुती गॅस ग्राहकांसाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवायसी केल्याशिवाय ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांनी केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.
सध्या सोशल मीडियावर एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे. ज्यात 'केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तरी ३ हजार रुपयांत गॅस सिलेंडर मिळेल' असा दावा केला जात आहे. मात्र, या व्हायरल मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नसून, तो पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा पुरवठा विभागाचे अधिकारी रमेश गायकवाड यांनी दिली आहे.
नागरिक व ग्राहकांनी अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. केवायसी प्रक्रियेच्या नावाखाली किंवा ग्राहकांच्या अडचणीचा फायदा घेऊन जर कोणी अतिरिक्त शुल्क वसूल करत असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. ग्राहकांनी अधिकृत गॅस एजन्सीमार्फतच आपली केवायसी प्रक्रिया मोफत आणि सुरक्षितपणे पूर्ण करून घ्यावी.
"सोशल मीडियावर ३ हजार रुपयांत सिलेंडर मिळण्याचा मेसेज अफवा असून, त्यात कोणतेही तथ्य नाही. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक ग्राहकाला केवायसी अनिवार्य आहे. कोणीही केवायसीशिवाय किंवा इतर कोणत्याही गैरमार्गाने ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे घेऊन सिलेंडरची बेकायदेशीर विक्री करत असल्याचे आढळल्यास, पुरवठा विभागाकडून संबंधित व्यक्ती अथवा एजन्सीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल."- रमेश गायकवाड, पुरवठा अधिकारी