नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उत्तर महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील अनुभवजन्य पर्यटनाच्या नकाशावर अधोरेखित करण्याच्या उद्देशाने नाशिक जिल्हा प्रशासनामार्फत सुरगाणा तालुक्यातील उदमाळ या आदिवासीबहुल गावाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'डार्क स्काय डेस्टिनेशन' अर्थात खगोल पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्यात येत आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद यांनी उदमाळ गावाची पाहणी करून जिल्हा नियोजन निधीतून या प्रकल्पासाठी ४२.९४ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
सार्वजनिक-खासगी भागीदारीतून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पात 'स्वदेस फाउंडेशन' आणि खगोलशास्त्र क्षेत्रातील 'ॲस्ट्रोनेरा' संस्था तांत्रिक व अंमलबजावणी भागीदार म्हणून कार्यरत आहेत. कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. कश्मिरा संख्ये यांच्या प्रशासकीय नेतृत्वाखाली प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू असून उदमाळ ग्रामसभेने 'डार्क स्काय पॉलिसी' अंतर्गत आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्याचा ठराव मंजूर केला आहे.
या अनुषंगाने स्थानिक आदिवासी समुदायाला केंद्रस्थानी ठेवून विकसित होणाऱ्या या प्रकल्पातून पर्यटनाचा आर्थिक लाभ थेट आदिवासी कुटुंबांपर्यंत पोहोचणार आहे. गावात होम स्टे, स्थानिक खाद्य पदार्थ, वारली व स्थानिक कलाकृती, पारंपरिक संगीत तसेच सुरक्षित व व्यसनमुक्त पर्यटन वातावरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच खगोल पर्यटनासाठी ३६० अंश आकाशदर्शनाची सुविधा असलेला ॲस्ट्रो-स्लॅब उभारण्यात येत असून, प्रकाश प्रदूषण कमी करण्यासाठी शिल्डेड व कमी तीव्रतेचे पथदिवे बसवण्यात येत आहेत.
स्थानिक तरुणांना दुर्बीण हाताळणी, तारे-नक्षत्रांची ओळख, खगोलशास्त्र तसेच आतिथ्य व होम स्टे व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचप्रमाणे दर अमावस्येला 'बत्ती गुल अमावस्या' उपक्रमातून कृत्रिम प्रकाश कमी करून पर्यटकांना अवकाशाचे, आकाशगंगेचे दर्शन घडविण्यात येणार आहे.
तसेच ३१ ऑक्टोबर रोजी 'स्टारगेझिंग फेस्टिव्हल' आयोजित करण्यात येणार आहे. दरम्यान, स्थानिक आमदार नितीन पवार यांनी या उपक्रमाचे स्वागत करून पर्यटन विकासासोबत शाळांचा दर्जा उंचावणे, तरुणांना व्यसनमुक्त करणे आणि स्थानिक समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त केली. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प नाशिकच्या पर्यटनाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.