नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारी (दि. १९) शिवभक्तांची होणारी गर्दी विचारात घेता विशेष नियोजन करण्यात आले आहे. या दिवशी त्र्यंबकला खासगी वाहनांना प्रवेशबंदी असेल. भक्तांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने २५० व सिटीलिंकने ५८ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर पोलिस तैनात केले जाणार आहे.
तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी फेरीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वरमध्ये १८ ते २० तारखेदरम्यान खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या काळात शिवभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर दर पाच मिनिटाला एक बस सोडण्याचा निर्णय झाला आहे. ब्रह्मगिरी फेरीवेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण फेरीमार्गावर साध्या वेशातील पोलिस तैनात करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी इगतपुरीचे प्रांताधिकारी सुधीर खांदे, 'सिटीलिंक'चे अधिकारी मिलिंद बंड, महामंडळाचे किरण भोसले यांच्यासह त्र्यंबकेश्वर नगरपालिका अधिकारी, पोलिस अधिकारी आदी उपस्थित होते.
तिसऱ्या श्रावणी सोमवारी नाशिक ते त्र्यंबकेश्वर १८० बस सोडण्यात येणार आहेत. अंबोली ते त्र्यंबकेश्वर १०, पहिणे ते त्र्यंबकेश्वर १०, घोटी ते त्र्यंबकेश्वर १०, खंबाळे ते त्र्यंबकेश्वर ४० या पद्धतीने जादा बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच नाशिक ते त्र्यंबकेश्वर मार्गावर सिटीलिंकच्या माध्यमातून नियमित २५ आणि जादा २३ असा एकूण ४८ बसेस सोडण्यात येतील, अशी माहिती सिटीलिंक अधिकाऱ्यांनी दिली आहे.